
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या KBC या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावतात. अशीच हजेरी लावली होती पंजाबी गायक तथा अभिनेता दिलजीत दोसांझने. दिलजीत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलिकडेच, त्याने अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या क्विज रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती 17 मध्ये हजेरी लावली होती. जिथे त्याने आदराने अमिताभ बच्चन यांच्या पाया पडला. पण याच गोष्टीमुळे तो चांगसाच अडचणीच सापडला आहे. त्याला यानंतर एका संघटनेकडून वारंवार धमकी येत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या पायांना स्पर्श केल्याने गोंधळ
31 ऑक्टोबर रोजी, निर्मात्यांनी शोच्या आगामी एपिसोडमधील एक प्रमोशनल क्लिप शेअर केली, ज्यामध्ये दिलजीत आदराने बिग बींच्या पाया पडताना दिसला.पण हा प्रोमो पाहूनच एपिसोड प्रसारित होण्याच्या आधी, बंदी घातलेल्या खलिस्तानी गट सिख्स फॉर जस्टिस (SFJ) ने व्हिडिओवरून दिलजीतवर निशाणा साधला. खलिस्तानी संघटनेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श केल्याबद्दल दिलजीतला इशारा दिला आणि 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या त्याच्या आगामी संगीत कार्यक्रमावर बंदी घालण्याची धमकी दिली आहे. ही संघटना प्रचंड आक्रमक झालेली दिसत आहे.
दिलजीतने शोमध्ये जाण्याचे कारण सांगितले
अखेर दिलजीतने वाद आणि धमक्यांना उत्तर देण्यासाठी दिलजीतने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, जिथे त्याने थेट धमक्यांना उत्तर न देता, कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होण्याचे कारण स्पष्ट केले. त्याच्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की तो वैयक्तिक प्रमोशनसाठी नाही तर पंजाबला पाठिंबा देण्यासाठी या शोमध्ये सहभागी झाला होता.
दिलजीत दोसांझची पोस्ट
दिलजीतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमात येण्याचे कारण स्पष्ट केले आणि लिहिले, “मी तिथे कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलो नव्हतो, किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या प्रमोशनसाठी गेलो नव्हतो. मी तिथे पंजाबमधील पूर… राष्ट्रीय स्तरावर या विषयावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. जेणेकरून लोक देणगी देऊ शकतील.”
वाद काय आहे?
एका खलिस्तानी दहशतवादी गटाने मेलबर्नमध्ये होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या संगीत कार्यक्रमात व्यत्यय आणण्याची धमकी दिली. जो शीख नरसंहार स्मृति महिन्यादरम्यान होत होता. या गटाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “बच्चन यांचे पाय स्पर्श करून, दिलजीत दोसांझने 1984 च्या शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे.” 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या हत्येमुळे शीखविरोधी दंगली झाल्या होत्या, ज्यामध्ये दिल्लीत सुमारे 2800 आणि संपूर्ण भारतात 3300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या दंगलींनंतर, अमृतसरस्थित अकाल तख्त साहिबने पीडितांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1 नोव्हेंबर हा शीख नरसंहार स्मृतिदिन म्हणून घोषित केला. आणि याच दरम्यान दिलजीत दोसांझाने दिलजीत दोसांझाने शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केल्याच या संघटनेचं म्हणणं आहे.