Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत या नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात अडकत असतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा वादांना निमंत्रण देतो. बॉलिवूडमध्ये तर त्यांनी अनेकांशी पंगा घेतला आहे.

भाजप खासदार कंगना रणौत या आक्रमकता आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अनेक सामाजिक मुद्यांवर त्या वेळोवेळी स्पष्टपणे मतं मांडत असतात. त्यासाठी कंगना यांना टीका आणि ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. चित्रपट सृष्टीतील अनेकांसोबत त्यांचे वाद सुरु असतात. हिंदुत्ववादी विचारांचं समर्थन करणाऱ्या कंगना राणौत यांनी आता अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार आहेत. ‘डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कोऑर्डिनेशन एंड मॉनिटरिंग कमेटी’ बैठकीत कंगना रणौत यांनी MPLADS स्कीम अंतर्गत निधीचं धीम्या गतीने वापर सुरु आहे, त्यावरुन अधिकाऱ्यांना चांगलचं झापलं.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कंगना रणौत यांनी खासदार निधीवरुन नाराजी प्रगट केली. माझ्या खासदार निधीमध्ये 11 कोटी रुपये उपलब्ध आहेत. पण अधिकाऱ्यांनी केवळ 50 लाख रुपये खर्च केलेत. कंगना यांनी बीडीओ लेव्हलच्या अधिकाऱ्याला या विलंबाबद्दल प्रश्न विचारले. काय खर्च केलाय, त्याचा रिपोर्ट मागितला. बैठकीत कंगन राणौत यांनी कठोर शब्द वापरले. मला फुकटमध्ये या खोट्या गोष्टी सांगू नका. मला प्रत्येक दिशा कमिटीच्या बठैकीत हेच ऐकायला मिळतं.
खर्चाचे आकडे यात ताळमेळ दिसत नाहीय
“जेव्हा मी दिशा कमिटीच्या बैठकीत MPLADS फंडाबद्दल विचारलं, तेव्हा मला काही अडचण नाही म्हणून सांगण्यात आलं. जवळपास 90 टक्के फंड खर्च झालाय असं सांगितलं. पण जे सांगितलं आणि वास्तवातले खर्चाचे आकडे यात ताळमेळ दिसत नाहीय” असं कंगना म्हणाल्या. एक खासदार म्हणून नॅशनल मीडियामध्ये माझ्या कामाची खिल्ली उडवली जात आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना टोमणा मारताना म्हटलं की, तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता.
काही अपशब्दांचा सुद्धा वापर केला
कंगना यांनी आरोप केला की, MPLADS फंडाची 30 ते 40 टक्के रक्कम बनावट लोकांमध्ये वाटण्यात आली आहे आणि पैशाची वसुली होत नाहीय. विकास फंडाच्या व्यवस्थापनावरुन त्यांनी काही अपशब्दांचा सुद्धा वापर केला. “लोक प्रलंबित असलेल्या विकास योजनांवर रिल्स बनवत आहेत आणि अधिकारी कार्यालयात बसून हसतायत” असं कंगना म्हणाल्या. मतदारसंघातील थांबलेल्या विकास प्रकल्पांना गती द्या असे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. उपलब्ध खासदारनिधीचा योग्य पद्धतीने वापर करण्यास त्यांनी सांगितलं.