
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये कलाकार किंवा अभिनेत्रीमुळे तो चित्रपट प्रचंड चर्चेत येतो. पण 38 वर्षांपूर्वी असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ना कलाकार, ना चित्रपटाची कथा चर्चेत आली. मात्र, हा चित्रपट फक्त एका मगरमच्छमुळे प्रचंड गाजला.
1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी दमदार भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. रेखा यांनी जवळपास एकहाती हा चित्रपट गाजवला असे म्हटले जाते. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत कबीर बेदी, सोनू वालिया आणि कादर खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते.
कथानकात मगरमच्छाचा थरार
चित्रपटाची कथा आरती (रेखा) या श्रीमंत घराण्यातील विधवेभोवती फिरते. तिच्या पतीचा कार अपघातात मृत्यू होतो तर वडिलांचीही हत्या होते. दोन मुलं आणि पाळीव कुत्र्यांसह ती एकटीच आयुष्याशी दोन हात करत असते.
तिच्या वडिलांचा मित्र हिरालाल (कादर खान) तिच्या आयुष्यात ‘फादर फिगर’ बनून प्रवेश करतो. मात्र त्यामागे वेगळेच कारस्थान असते. तो आपल्या पुतण्याला संजयला (कबीर बेदी) आरतीच्या आयुष्यात आणतो जेणेकरून तिच्या संपत्तीवर ताबा मिळवता येईल. आरतीची मैत्रीण नंदिनी (सोनू वालिया)ही या कटात सामील असते.
सर्वजण मिळून आरतीला संजयशी लग्न करण्यास प्रवृत्त करतात. लग्नानंतर मात्र खरी नाट्यमय वळण सुरू होते. संजय आणि नंदिनी आरतीला सहलीच्या बहाण्याने घेऊन जातात आणि मगरमच्छांनी भरलेल्या पाण्यात ढकलून देतात.
मृत्यूपासून सुटका आणि बदला
संजय आणि नंदिनीला वाटते की आरतीचा मृत्यू झाला आहे. मात्र मगरमच्छांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही ती बचावते. प्लास्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा बदलतो आणि ती नव्या ओळखीने परतते.
यानंतर सुरू होते सूडनाट्य. आरती एक-एक करून संजय, नंदिनी आणि हिरालाल यांच्या आयुष्याचा विध्वंस करते. शेवटी ती आपल्या शत्रूंनाही तसाच धडा शिकवते जसा तिच्यासोबत झाला होता. त्यांना देखील मगरमच्छांच्या तावडीत सोपवून देते.
‘खून भरी मांग’मध्ये मगरमच्छाचे सीन काही मिनिटांचे असले तरी त्यांनी संपूर्ण चित्रपटाला वेगळी ओळख दिली. सुरुवातीपासून क्लायमॅक्सपर्यंत मगरमच्छ हा कथानकाचा महत्त्वाचा भाग राहिला. थरार, भावनिक संघर्ष आणि सूडाची कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.