प्रसिद्ध अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्री सोडून पोहोचली प्रेमानंद महाराजांच्या शरणी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रेमानंद महाराजांच्या शरणी पोहोचली आहे. अभिनयात आता रस उरला नाही, असं तिने म्हटलंय. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने आजारपणाचाही खुलासा केला होता.

प्रसिद्ध अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्री सोडून पोहोचली प्रेमानंद महाराजांच्या शरणी
अभिनेत्रीने निवडला अध्यात्मचा मार्ग
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 26, 2024 | 1:28 PM

टीव्ही असो किंवा बॉलिवूड.. आजवर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी झगमगत्या इंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. यात असेही काही कलाकार होते, ज्यांनी मोहाचा त्याग करून अध्यात्माची वाट धरली आणि ते पुन्हा रोजच्या आयुष्यात परतले. अभिनेते विनोद खन्ना यांनी अध्यात्मासाठी सर्वकाही सोडलं होतं. पण नंतर ते पुन्हा अभिनयविश्वात परतले होते. अशातच आणखी एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे. या अभिनेत्रीने टीव्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय. ‘अगले जनम मोहे बिटियाँ ही किजो’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘महाभारत’ मालिकेत अम्बाची भूमिका साकारली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे रतन राजपूत.

रतनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती प्रेमानंद महाराज यांच्या शरणी गेल्याचं पहायला मिळतंय. ती प्रेमानंद महाराजांना विचारते, “मी गेल्या पाच वर्षांपासून अध्यात्माच्या मार्गावर आहे. या मार्गावर आल्यापासून माझं अभिनयात मन रमत नाही. अभिनय आणि अध्यात्म या दोन गोष्टी एकत्र घेऊन मी कसं पुढे जाऊ शकते?”

रतनच्या या प्रश्नावर प्रेमानंत महाराज म्हणतात, “जेव्हा तुम्हा समजतं की नोट खोटी आहे, तेव्हा तुम्हाला ती उचलण्यातही कष्ट घ्यायचे नसतात. अध्यात्मचा अर्थ सत्य विषय आहे. जेव्हा आपण सत्याच्या दिशेने चालतो तेव्हा असत्यमध्ये, अभिनयात कसा रस निर्माण होईल? जर मला माहित आहे की मला सेवा करायची आहे आणि ही सेवा देवाची आहे. हा एक नाटकाचा मंच आहे. इथे कोणीच गुरू किंवा शिष्य नाही. एकच परमात्मा हा सगळ्या रुपात आहे.”

रतनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनय सोडण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याने अधिक प्रकाश सहन करू शकत नाही, असं तिने सांगितलं. इतकंच नव्हे तर या आजारामुळे तीव्र सूर्यप्रकाशही सहन करू शकत नसल्याचं तिने म्हटलंय. यामुळे तिला दिवस आणि रात्रीसुद्धा गडद किंवा काळ्या रंगाचा चष्मा घालावा लागतो. रतनला ऑटोइम्युन आजार आहे. असाच आजार अभिनेत्री समंथा रुथ प्रभूलाही आहे.