सलग चार फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारने बदलला प्लॅन; घेतला मोठा निर्णय

| Updated on: Nov 09, 2022 | 6:26 PM

अक्षय कुमारचा नवीन गेम प्लॅन; व्हिडीओ पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

सलग चार फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारने बदलला प्लॅन; घेतला मोठा निर्णय
Follow us on

मुंबई- या वर्षभरात आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमारचे चार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र या चारही चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. अक्षयचा पाचवा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचीही फारशी चर्चा झाली नाही. एकानंतर एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याने आता अक्षयने आपला गेम प्लॅन बदलला आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्याचीच घोषणा नुकतीच त्याने सोशल मीडियाद्वारे केली. अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बच्चन पांडे, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज आणि राम सेतू हे चार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. तर ‘कटपुतली’ हा अक्षयचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चारही चित्रपटांच्या अपयशामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं.

हे सुद्धा वाचा

अक्षयने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याने मोठी घोषणा केली आहे. “काहीतरी नवीन करण्याची जी मजा आहे, त्याची गोष्टच निराळी आहे. गेल्या काही काळापासून मी त्या गोष्टीवर काम करतोय. लवकरच त्याविषयीची माहिती मिळेल”, असं अक्षय या व्हिडीओत म्हणाला.

अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केले आहेत. ‘आता हेरा फेरी करून टाक’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘अक्षयचे पुढील प्रोजेक्ट्स हे हेरा फेरी 3, आवारा पागल दिवाना 2 आणि वेलकम 3 हे असतील’, असं दुसऱ्याने म्हटलं. ‘एकवेळ काहीच काम करू नकोस, पण रिमेक बनवणं बंद कर’, असा टोलाही एका नेटकऱ्याने लगावला. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ‘हेरा फेरी’च्या घोषणेचा अंदाज वर्तवला. मात्र हा नवीन प्रोजेक्ट काय असेल, ते अद्याप कोणालाच ठाऊक नाही.

काही दिवसांपूर्वीच अक्षय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची मोठी घोषणा झाली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूकसुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता.