त्यात काय खास होतं? ‘सैय्यारा’च्या यशावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला, “फक्त नशिबाने..”
अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'सैय्यारा' या चित्रपटावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात असं काय खास होतं, असा थेट सवाल त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर यावेळी तो चित्रपटातील मुख्य अभिनेत्याचं नावदेखील विसरला.

अभिनेता अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अहमद खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय. अक्षय सध्या अहमदसोबतच चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतोय. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याच्या कारणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. हल्ली कोणता चित्रपट हिट होईल, याचा काही नेम नाही. कधीकधी बिग बजेट आणि कलाकारांची मोठी फौज असलेला चित्रपटसुद्धा फ्लॉप होतो आणि अत्यंत कमी बजेटचा पण दमदार कथानक असलेला चित्रपट हिट ठरतो. याचविषयी बोलताना अक्षयने ‘सैय्यारा’ या चित्रपटाविषयी असं काही मत मांडलंय, जे ऐकून नेटकरीही चकीत झाले आहेत.
दिग्दर्शक अहमद खानसोबत चर्चा करताना अक्षय कुमाने अनीत पड्डा आणि अहान पांडे यांच्या ‘सैय्यारा’ या हिट चित्रपटाचं उदाहरण दिलं. यावेळी अक्षय म्हणाला की, यश हा फक्त नशिबाचा खेळ आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्यासाठी एखाद्या चित्रपटात भरपूर घटनाक्रम किंवा मोठी घटना दाखवणं गरजेचं नाही, असं मत त्याने यावेळी मांडलं. ‘IANS’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय ‘सैय्यारा’चं उदाहरण देत म्हणाला, “या चित्रपटाशी कोणतीही मोठी घटना किंवा प्रसंग संबंधित नव्हता, तरीही त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. सैय्यारा हा चित्रपट फक्त त्याच्या गाण्यांमुळे आणि रोमँटिक पैलूंमुळे प्रेक्षकांना आवडला होता.”
थिएटरमध्ये कोणत्या प्रकारचे चित्रपट चालतात, असं विचारलं असता अक्षय पुढे म्हणाला, “जर एखाद्या चित्रपटाच्या नशिबात यशस्वी होण्याचं असेल, तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने यशस्वी होतोच. अलीकडेच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात एक नवीन अभिनेत्री आणि नवीन अभिनेता होता. तो कोणता चित्रपट होता?” तेव्हा अहमद खानने त्याला चित्रपटाचं नाव सांगितलं. त्यावर अक्षय म्हणाला, “हो, सैय्यारा.. या चित्रपटात कोणती खास गोष्ट होती? मला विचारायचं आहे की या चित्रपटात काय खास होतं? काहीच खास नव्हतं. फक्त त्यातील गाणी आणि रोमान्स लोकांना आवडला होता. याच गोष्टी चालल्या. अभिनेता आणि अभिनेत्रीने चांगलं काम केलं आणि ते नशिबवान होते, म्हणून त्यांचा चित्रपट इतका चालला.”
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत झाली होती. हा 2025 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता.
