Akshaye Khanna : 21 कोटींची मागणी की विग? ‘दृश्यम 3’च्या दिग्दर्शकाने सर्वच केलं स्पष्ट, खरंच अक्षयच्या डोक्यात गेली यशाची हवा?

अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'दृश्यम 3' या चित्रपटातून माघार घेतल्याने वादात सापडला आहे. त्याच्यावर निर्मात्यांनी बरेच आरोप केले आहेत. अशातच आता दिग्दर्शकाने अक्षयच्या एक्झिटमागचं कारण सांगितलं आहे.

Akshaye Khanna : 21 कोटींची मागणी की विग? दृश्यम 3च्या दिग्दर्शकाने सर्वच केलं स्पष्ट, खरंच अक्षयच्या डोक्यात गेली यशाची हवा?
अक्षय खन्ना
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2025 | 12:05 PM

‘धुरंधर’च्या यशादरम्यान अभिनेता अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी अक्षयने चित्रपटातून माघार घेतल्याने निर्माते त्याच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. निर्माते कुमार मंगत यांनी त्याला बरंच काही सुनावलं आहे. इतकंच नव्हे तर अक्षय ‘अनप्रोफेशनल’ असल्याची टीका त्यांनी केली. अक्षयविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी नोटीससुद्धा बजावली आहे. आता चित्रपटात अक्षयची जागा अभिनेता जयदीप अहलावतने घेतल्याची चर्चा आहे. या संपूर्ण वादादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक पाठकने सांगितलं की चित्रपटात जरी जयदीप अहलावतला महत्त्वपूर्ण भूमिकेची ऑफर दिली असली तरी त्याने अक्षय खन्नाची जागा घेतलेली नाही. किंहबुना जयदीपसाठी नवीन भूमिका लिहिण्यात आली आहे. यावेळी अभिषेकने अक्षय खन्नाच्या एक्झिटबाबत अजय देवगणच्या प्रतिक्रियेचाही खुलासा केला आहे. तो म्हणाला, “त्याने (अजय) याबद्दलचा संपूर्ण निर्णय माझ्यावर सोपवला आहे. हा माझ्या, अक्षय खन्नाच्या आणि प्रॉडक्शनदरम्यानचा मुद्दा आहे. नोव्हेंबरमध्ये करार साइन झाल्यानंतर हे सर्वकाही घडलं होतं. शूटिंग होण्याच्या ठीक पाच दिवस आधी अक्षयने चित्रपट सोडला होता. त्याचा लूक निश्चित झाला होता, कॉस्च्युम तयार होतं, कथा सांगितली गेली होती. त्याला कथा खूपच आवडली होती.”

“माझा चित्रपट जिथे संपला होता, तिथूनच सुरू होणार आहे. असं होऊच शकत नाही की दिवसा अक्षय कोर्टरुममध्ये दिसेल आणि संध्याकाळी त्याच्या डोक्यावर काळे केस दिसतील. हे कसं शक्य आहे? मी त्याला विगबद्दल आधीच स्पष्ट केलं होतं आणि त्यावर अक्षयनेही होकार दिला होता. परंतु काही दिवसांनंतर तो पुन्हा तीच मागणी घेऊन माझ्याकडे आला. तेव्हा आम्ही त्याला सांगितलं की यावर आपण काम करू.” निर्माते कुमार मंगत यांनी मुलाखतींमध्ये सांगितलं की अक्षयने ‘धुरंधर’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘दृश्यम 3’ सोडला होता. इथे पैशांचा काहीच मुद्दा नव्हता.

अक्षयने मागितले 21 कोटी रुपये?

अक्षयने ‘दृश्यम 3’साठी 21 कोटी रुपये मानधन मागितले का, असा प्रश्न विचारला असता अभिषेकने स्पष्ट केलं की, “मानधनाचा जो आकडा ठरवण्यात आला होता, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. परंतु दोन्ही पक्षांच्या सहमतीने डील झाली होती. करार साइन झाला होता. त्यानंतर हा सगळा ड्रामा सुरू झाला. माझ्या मते अक्षय खन्नाचा चित्रपट सोडण्याचा निर्णय हा बाहेरच्या लोकांच्या बोलण्यावरून प्रभावित होता. मला असं वाटतं की त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला म्हटलं असेल की तू आता सुपरस्टार झाला आहेस. त्यामुळे तू फक्त असेच प्रोजेक्ट करायला हवे, जे फक्त तुझ्याबाबतचे आहेत. मी त्याला माझ्याकडून फक्त शुभेच्छा देईन. त्याने आता सोलो चित्रपट करण्याचा प्रयत्न करावा.”

अक्षयसोबतचा हा वाद तू सोडवण्याचा प्रयत्न केलास का, असंही अभिषेकला या मुलाखतीत विचारलं गेलं. त्यावर तो म्हणाला, “जेव्हा अक्षयकडे कोणतं उत्तर नसतं, तेव्हा त्याला माहीत नसतं की आपण काय बोलावं? तो खूप मूर्खपणा करतोय, कारण आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. मी प्रकरण सोडवण्यास टाळाटाळ केली कारण मला वाटलं की सध्या त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तो सध्या वेगळ्याच विश्वास आहे. धुरंधर हा एक उत्तम चित्रपट आहे आणि बॉक्स ऑफिसवर तो चांगली कमाई करतोय. पण हे एक टीमवर्क आहे. एका व्यक्तीबद्दल नाही.”