Gadar 2 | ‘गदर 2’ प्रदर्शित होण्याआधी अमीषा पटेलचा मोठा खुलासा; निर्मात्यांवर केले गंभीर आरोप

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यातील मुख्य अभिनेत्री अमिषा पटेलने प्रॉडक्शन टीमवर काही आरोप केले आहेत. सेटवर योग्य पद्धतीचं व्यवस्थापन नव्हतं, असा खुलासा तिने केला आहे.

Gadar 2 | गदर 2 प्रदर्शित होण्याआधी अमीषा पटेलचा मोठा खुलासा; निर्मात्यांवर केले गंभीर आरोप
Ameesha Patel
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2024 | 3:54 PM

मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेल बऱ्याच वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती जवळपास 22 वर्षांनंतर सकिनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अमीषाचं एक ट्विट चर्चेत आलं होतं, ज्यामध्ये तिने कथेचा महत्त्वपूर्ण भाग सांगितल्याची टीका झाली. त्यानंतर आता आणखी काही ट्विट्सद्वारे तिने दिग्दर्शिक अनिल शर्मा त्यांच्या प्रॉडक्शन टीमवर काही आरोप केले आहेत. सेटवरील व्यवस्थापन योग्य नसल्याचा खुलासा तिने या ट्विट्सद्वारे केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी पुढाकार घेऊन समस्या सोडवल्याबद्दल तिने झी स्टुडिओजचे आभार मानले आहेत.

काय म्हणाली अमीषा?

‘चंदीगडमध्ये मे महिन्यात गदर 2 या चित्रपटाच्या अंतिम शेड्युलचं शूटिंग पार पडलं. यावेळी अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून काही घटना घडल्याचं चाहत्यांच्या कानावर पडलं आणि त्यांनी काळजी व्यक्त केली. अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून काही तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट्स, कॉस्च्युम डिझायनर्स यांसह इतर काही जणांना योग्य मानधन न मिळाल्याची तक्रार होती. हे खरं आहे. पण झी स्टुडिओजने पुढाकार घेतला आणि सर्वांचं थकलेलं मानधन देण्यात आलं’, असा खुलासा तिने केला.

या तक्रारींबाबत तिने पुढे लिहिलं, ‘होय राहण्याची व्यवस्था, प्रवासाचा खर्च, जेवणाचा खर्च यापैकी कोणतीच गोष्ट काही कलाकारांना आणि चित्रपटाच्या टीममधील क्रू मेंबर्सना देण्यात आली नव्हती. कारची सोय न केल्याने काही जणांना ताटकळत राहावं लागलं होतं. पण याबाबतही झी स्टुडिओजने खूप मोठी मदत केली. अनिल शर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्माण झालेल्या समस्यांचं निवारण झी स्टुडिओजने केलं.’

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. तारा सिंग आणि सकीनाच्या प्रेमकहाणीने बरीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल हे पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.