2-4 कोटी घ्या अन् निघा, एवढे 45 कोटी कोण देणार? रणवीरच्या ‘डॉन 3’ वादावरून अभिनेता संतापला
'डॉन 3' वादात अभिनेता आणि गायक ॲमी वर्कनेही रणवीर सिंहची बाजू घेतली आहे. जेव्हा रणवीरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत होते, तेव्हा डॉन 3 च्या निर्मात्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, असं तो म्हणाला.

फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंहविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या फेडरेशनने रणवीरविरोधात इंडस्ट्रीत ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ म्हणजे असहकाराचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात इंडस्ट्रीतून विरोध झाल्यानंतर आणि रणवीरकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर अखेर हे निर्देश मागे घेण्यात आले. याप्रकरणी अनेक कलाकारांनी रणवीरची बाजू घेतली आहे. त्यात आता अभिनेता आणि गायक ॲमी वर्कचीही भर पडली आहे. ॲमीने थेट फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जेव्हा रणवीरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत होते आणि तो कठीण काळातून जात होता, तेव्हा ‘डॉन 3’चे निर्माते गप्प होते, पण जेव्हा त्याला ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला, हा विरोधाभास ॲमी वर्कने बोलून दाखवला.
काय म्हणाला ॲमी वर्क?
रणवीरचे चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर विशेष चालत नव्हते, तेव्हा त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं, मात्र जेव्हा तो पुन्हा ट्रॅकवर आला, तेव्हा त्याला लक्ष्य केलं जात असल्याचं मत, ॲमीने यावेळी मांडलं. ‘कनेक्ट सिने’ला दिलेल्या मुलाखतीत ॲमीने रणवीर सिंहच्या या वादावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांनी ’83’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘डॉन 3’च्या वादाबद्दल सविस्तर माहिती नसली तरी माझा रणवीरवर पूर्ण विश्वास असल्याचं ॲमी म्हणाला.
“मला असं वाटतं की जेव्हा रणवीरचे चित्रपट फ्लॉप झाले होते, तेव्हा तुम्ही (एक्सेल एंटरटेन्मेंटने) डॉन 3 या चित्रपटाचं शूटिंग सुरू करू शकत होते. पण तेव्हा त्यांनी रणवीरकडे दुर्लक्ष केलं. आता जेव्हा धुरंधर हिट झाला, तेव्हा ते पैसे परत मागत आहेत. ते त्यांना जे हवंय ते करू शकतात. 2-4 कोटी.. जेवढे त्यांचे पैसे असतील ते त्यांनी घ्यावेत आणि पुढे निघून जावं. एवढे 45 कोटी रुपये कोण देणार? यात रणवीरची काही चूक आहे असं मला वाटत नाही. वाटल्यास ते त्याच्याविरोधात खटला दाखल करू शकतात, पण अशा खटल्यांचं पुढे काहीच होत नाही. वीस वर्षांपर्यंत ते कोर्टात सुरूच राहतात”, अशी प्रतिक्रिया ॲमीने दिली आहे.