जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट
अमोल कोल्हे यांनी 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या 14 जूनपासून ही मालिका बंद होणार आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली. यासंदर्भात आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.
अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात सुरुवातीला मालिकेतील एक दृश्य पहायला मिळतंय. ‘सगळंच संपलंय सावित्री..’ असं ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना म्हणतात. तेव्हा सावित्रीबाईंच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. ‘जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते. थोडंसं थांबणं आवश्यक असतं. जरा निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी, नव्या जोमाने झेपावण्यासाठी,’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार, असंही अमोल कोल्हेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. व्हिडीओत पुढे ते गाईंसोबत निवांत वेळ घालवताना, त्यांना कुरवाळताना दिसत आहेत. अमोल कोल्हेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मालिका बंद करू नका, अशी विनंती अनेकांनी केली आहे.
अमोल कोल्हेंचा व्हिडीओ-
‘सावित्रीबाई फुले’ मालिका म्हणजे आपल्या गौरवशाली इतिहासाचा आरसा आहे. आजच्या पिढीला याची खूप गरज आहे. ही मालिका बंद न करता पुढे चालू ठेवावी, ही नम्र विनंती,’ अशी मागणी एकाने केली. तर ‘शेवटी नेहमी सत्याचा विजय होतो. आपण करत असलेलं कार्य हे आज घरघरात गेलं आहे. साऊ जोतीचे विचार कधीच संपणार नाही, उलट ती ज्योत अजून झळकत राहील,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘समाजाला सकारात्मक विचार देणाऱ्या मालिका दुर्मिळ असतात. मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही त्यापैकीच एक आहे. अशा प्रेरणादायी कथा थांबू नयेत, मालिका सुरू ठेवा,’ अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे.
14 जून 2026 पासून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीचं कारण देत अवघ्या पाच महिन्यात ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेच्या जागी ‘सुना येती घरा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.