‘धुरंधर’ पाहिल्यानंतर अनुराग कश्यपला राहावलं नाही; म्हणाला ‘एखादा गुप्तहेर शत्रूवर..’

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग त्याची मतं बिनधास्तपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. 'धुरंधर'मधील काही संवाद त्याला प्रचारकी वाटल्याचं त्याने म्हटलंय.

धुरंधर पाहिल्यानंतर अनुराग कश्यपला राहावलं नाही; म्हणाला एखादा गुप्तहेर शत्रूवर..
Anurag Kashyap and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 05, 2026 | 11:06 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या यशाचा डंका संपूर्ण जगात वाजतोय. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे एक गट असाही आहे, जो या चित्रपटाला ‘प्रोपेगेंडा’ (प्रचारकी) म्हणतोय. यात आता ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यपचाही समावेश झाला आहे. अनुराने नुकताच रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ पाहिला आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने या चित्रपटातील काही डायलॉग्सवर आक्षेप घेतला असून दिग्दर्शक आदित्य धरवरही निशाणा साधला आहे.

अनुराग कश्यपला बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मानलं जातं. कोणत्याही मुद्द्यावर तो आपली बेधडक मतं मांडायला तयार असतो. याआधी त्याने थेट बॉलिवूड इंडस्ट्रीवरही टीका केली होती. आता त्याने ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर काय वाटलं, याविषयी सांगितलं आहे. ‘लेटरबॉक्सडी’वर अनुरागने या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिला आहे. त्यात त्याने म्हटलंय, ‘एखादा गुप्तहेर शत्रूवर राग बाळगल्याशिवाय गुप्तहेर होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एखादा सैनिक शत्रूवर राग बाळगल्याशिवाय सैनिक होऊ शकत नाही. मला या दोन्ही गोष्टींवर आक्षेप नाही, पण चित्रपटात काही संवाद असे आहेत, जे मला आवडले नाहीत. एकीकडे अजय सन्यालचं पात्र म्हणतं की असा दिवस येईल, जेव्हा प्रत्येकजण देशाबद्दल विचार करेल. दुसऱ्या सीनमध्ये हमजा म्हणतो, हा नवा भारत आहे. माझ्या मते हे संवादच प्रचारकी आहेत. पण या चित्रपटाचं सार इतकं मजबूत आहे की त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला वेळ लागत नाही. रणवीर सिंहने या चित्रपटात दमदार काम केलंय.’

‘धुरंधर’च्या या रिव्ह्यूमध्ये अनुरागने दिग्दर्शक आदित्य धरबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘आदित्य धर याला मी तेव्हापासून ओळखतो, जेव्हा त्याच्या ‘बूंद’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या लघुपटासाठी त्याने लेखक म्हणून काम केलं होतं. तुम्ही माझ्याशी सहमत असो वा नसो, तो माणूस प्रामाणिक आहे. इतरांसारखा संधीसाधू नाही. त्याचे सर्व चित्रपट काश्मीरबद्दल आहेत, तो स्वत: एक काश्मिरी पंडित आहे ज्याने दु:ख सगन केलंय. एकतर तुम्ही त्याच्याशी वाद घाला किंवा त्याला जसं आहे तसं राहू द्या. जर मला धुरंधरच्या राजकारणाबद्दल वाद घालायचा असता तर मी थेट आदित्यला फोन करेन. परंतु हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहे हे नाकारता येत नाही’, असं अनुरागने लिहिलं.

‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं आहे. जगभरात ‘धुरंधर’ने तब्बल 1167 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.