‘बडे अच्छे लगते है 2’च्या मुख्य कलाकारांनीच केला मालिकेला रामराम; नकुल मेहताने सोडलं मौन

| Updated on: Jan 01, 2023 | 10:47 AM

लोकप्रिय मालिकेच्या दोन मुख्य कलाकारांनी अचानक सोडला प्रोजेक्ट; चाहत्यांकडून नाराजी व्यक्त होत असतानाच अभिनेत्याने सांगितलं कारण

बडे अच्छे लगते है 2च्या मुख्य कलाकारांनीच केला मालिकेला रामराम; नकुल मेहताने सोडलं मौन
Nakul Mehta and Disha Parmar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: ‘बडे अच्छे लगते है 2’ या मालिकेने पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं होतं. ‘बडे अच्छे लगते है’च्या पहिल्या सिझनमध्ये राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका जेव्हा संपली, तेव्हा चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र जेव्हा दुसऱ्या सिझनची घोषणा झाली, तेव्हा राम आणि साक्षीची जागा कोण घेणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती.

‘बडे अच्छे लगते है 2’ या मालिकेत राम कपूरची जागा अभिनेत्री नकुल मेहता आणि साक्षीची जागा दिशा परमारने घेतली. या नव्या जोडीलाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. नकुल आणि दिशा यांच्यातील केमिस्ट्रीमुळे दुसरा सिझनसुद्धा हिट ठरला. मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येतेय. नकुल आणि दिशा या मालिकेच्या दोन मुख्य कलाकारांनी ही मालिका सोडली आहे.

हे सुद्धा वाचा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नकुलने मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. “या मालिकेची घोषणा झाली तेव्हा माझ्या मनात बरेच प्रश्न होते. राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी जेवढी लोकप्रियता या मालिकेला मिळवून दिली, तेवढीच आम्हीसुद्धा मिळवून देऊ शकू का, असा प्रश्न होता. मात्र आम्हालाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. माझ्यासाठी या मालिकेचा प्रवास खूपच सुंदर होता. या मालिकेत आता लीप येणार आहे. त्यामुळे नव्या कथेत आमच्या भूमिकेसाठी फारसं वाव नाही”, असं नकुलने स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून नकुल आणि दिशाच्या एग्झिटची चर्चा होती. यादरम्यान मालिकेत हितेनची एण्ट्री झाली. हितेन या मालिकेत राम कपूरच्या छोट्या भावाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या कथेत लीप येणार असल्याने नकुल आणि दिशाने मालिकेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.