गाणं पाहिजे तर असं, ज्याच्या नावावरून तयार झाली 644 भागांची मालिका, आजही त्या गाण्याची क्रेझ कायम
50 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे सुपरहिट होताच या गाण्यावरून तयार झाली 644 भागांची मालिका. किशोर कुमार यांच्या मुलाच्या आवाजामुळे गाण्याला मिळाली प्रचंड लोकप्रियता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक अमित कुमार यांनी आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली. त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘बडे अच्छे लगते हैं’. या गाण्यातील ओळी आजही सोशल मीडिया रील्सपासून ते अंताक्षरीपर्यंत आवर्जून ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे, याच गाण्याच्या लोकप्रियतेवर आधारित एक आयकॉनिक टीव्ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
हे गाणं 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बालिका वधू’ या गाजलेल्या चित्रपटातील आहे. या चित्रपटाने नुकताच प्रदर्शित होऊन 50 वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने ‘अल्ट्रा प्ले ओटीटी’कडून नव्या पिढीतील प्रेक्षकांना या क्लासिक चित्रपटाची आणि त्यातील निरागस व्यक्तिरेखांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट
दिग्गज चित्रपट निर्माते शक्ती सामंत यांनी निर्मिती केलेला ‘बालिका वधू’ हा चित्रपट प्रसिद्ध बंगाली साहित्यिक बिमल कर यांच्या कादंबरीवर आधारित होता. सचिन पिळगावकर आणि रजनी शर्मा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. बालवयातील निरागसतेपासून वैवाहिक जीवनातील नातेसंबंध आणि जबाबदाऱ्या समजून घेण्यापर्यंतचा एका तरुण जोडप्याचा प्रवास या चित्रपटातून भावनिक पद्धतीने मांडण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयासोबतच ‘बालिका वधू’चं संगीत हे त्याचं प्रमुख आकर्षण ठरलं. संगीतकार आर. डी. बर्मन म्हणजेच पंचमदा यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं. गीतकार आनंद बक्षी यांनी चित्रपटातील गाणी लिहिली. अमित कुमार, किशोर कुमार, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांसारख्या दिग्गज गायकांनी आपल्या आवाजाने या चित्रपटातील गाण्यांना वेगळीच उंची मिळवून दिली.
गाण्यावर ठेवलं मालिकेचं नाव
यातील अमित कुमार यांच्या आवाजातील ‘बडे अच्छे लगते हैं’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं. साध्या, प्रेमळ आणि निसर्गरम्य भावनांनी भरलेलं हे गाणं अनेक दशकांनंतरही तितकंच ताजं वाटतं. काळ बदलला, संगीताच्या शैली बदलल्या, मात्र या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.
विशेष म्हणजे, या गाण्याच्या ओळींवरूनच सोनी टीव्हीवरील ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेचं नाव ठेवण्यात आलं होतं. राम कपूर आणि साक्षी तंवर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मालिकेने सुमारे तीन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि तब्बल 644 भागांचा टप्पा गाठला.