नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण

| Updated on: Mar 14, 2022 | 4:04 PM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याच्या दोन्ही घटस्फोटांमागील (Divorce) कारण सांगितलं. करिअरच्या मागे पळताना कुटुंबीयांकडे लक्ष देणं राहूनच गेलं, अशी कबुली त्याने या मुलाखतीत दिली.

नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण
Aamir Khan family
Image Credit source: Filmfare
Follow us on

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याचा 57वा वाढदिवस साजरा करतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याच्या दोन्ही घटस्फोटांमागील (Divorce) कारण सांगितलं. करिअरच्या मागे पळताना कुटुंबीयांकडे लक्ष देणं राहूनच गेलं, अशी कबुली त्याने या मुलाखतीत दिली. आमिरने रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. 16 वर्षांच्या संसारानंतर रिना आणि आमिर विभक्त झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी (Kiran Rao) लग्न केलं. किरण आणि आमिरला आझाद हा मुलगा आहे. 15 वर्षांच्या संसारानंतर किरण आणि आमिरने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी पार पडण्यात कमी पडल्याची खंत आमिरने यावेळी व्यक्त केली.

खासगी आयुष्यात नेमकं कुठे बिनसलं याविषयी ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात मी कुठेतरी कमी पडलो. माझे पालक, भाऊबहीण, माझी पहिली पत्नी रिनाजी, किरणजी, रिनाचे पालक, किरणचे पालक, माझी मुलं हे सर्व माझ्या जवळचे आहेत. मी 18 वर्षांचा असताना इंडस्ट्रीत आलो. त्यावेळी मी इंडस्ट्रीत इतका गुंतून गेलो की मला खूप काही शिकायची इच्छा निर्माण झाली. पण आज मला जाणवतं की माझ्या जवळच्या व्यक्तींना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही.”

“मी माझा पूर्ण वेळ कामासाठी दिला आणि कामासोबतचं नातं घट्ट केलं. माझं कुटुंब माझ्यासोबत नेहमीच राहील असं मी गृहीत धरलं. त्यावेळी मला प्रेक्षकांची मनं जिंकायची होती. त्या वाटेत मी इतका हरवून गेलो मी माझं कुटुंब माझी वाट पाहतंय हे विसरूनच गेलो होतो”, अशी खंत आमिरने व्यक्त केली.

मुलगी आयराबद्दल आमिर पुढे म्हणाला, “मुलांसोबत पुरेसा वेळ घालवू शकलो नाही, मी माझी सर्वांत मोठी चूक आहे. पण त्यासाठी मी माझ्या प्रोफेशनला दोष देणार नाही. आज आयरा ही 23 वर्षांची आहे, पण जेव्हा ती चार-पाच वर्षांची होती, तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो. मी माझ्या चित्रपटांमध्येच व्यग्र होतो. प्रत्येक मुलाला पालकांची गरज असते. पण जेव्हा तिला सर्वांत जास्त माझी गरज होती, तेव्हा मी तिच्याजवळ नव्हतो. जेव्हा ती भीतीच्या छायेत होती, तेव्हा तिचा हात हातात घ्यायला मी तिकडे नव्हतो. मला माहितीये की ते क्षण आता पुन्हा कधीच परत येणार नाहीत.”

आमिर आणि रिना यांची मुलगी आयरा हिने अनेकदा सोशल मीडियावर नैराश्याबाबत खुलासा केला. डिप्रेशनबाबत तिने व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत.