‘काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही’; ‘झुंड’बाबत ‘धुरळा’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत

| Updated on: Mar 12, 2022 | 3:53 PM

'काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही', असं म्हणत क्षितिजने 'झुंड'ची सकारात्मक बाजू प्रेक्षकांसमोर मांडली आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आठवड्याभरात 10 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.

काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही; झुंडबाबत धुरळाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत
Kshitij Patwardhan on jhund
Image Credit source: Instagram
Follow us on

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली आहे. आमिर खान, धनुष, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. आता ‘धुरळा’ या मराठी चित्रपटाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. क्षितिजने झुंड या चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केले आहेत. ‘काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही’, असं म्हणत क्षितिजने ‘झुंड’ची सकारात्मक बाजू प्रेक्षकांसमोर मांडली आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आठवड्याभरात 10 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. झुंडला आयएमडीबी रेटिंगसुद्धा 9.3/10 इतकी पहायला मिळाली आहे.

क्षितिज पटवर्धनच्या पोस्टमधील काही महत्त्वपूर्ण मुद्दे-

  1. माझ्या पाहण्यात लगानसारख्या सिनेमात कचरा नावाच्या एका साईड कॅरेक्टरने सुरू झालेला उपेक्षित घटकांचा प्रवास आज झुंडमधून नायकांच्या नव्या फळीपर्यंत पोहोचलाय, ही फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे.
  2. स्वत:च निर्माण केलेल्या विघातक परिस्थितीच्या कचाट्यातून बाहेर पडून सकारात्मक मार्ग पत्करणारा, द्वेष नाही तर प्रेम स्वीकारणारा, जीव घेण्यापासून जिवावर उदार होण्यापर्यंत लढणारा नायक नागराजने तयार केलाय, म्हणून तो प्रचंड रेलेवंट आहे.
  3. खेळाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट बदलाची आहे, शक्यतेची आहे, स्वप्नाची आहे. ती जेवढी सिनेमॅटिक आहे, तितकीच खरीखुरी ही आहे. ती दोन पातळ्यांवर पळणारी आहे. एक कथा खेळातून पुढे सरकते आणि दुसरी सामाजिकतेतून, वाक्यातून, दृश्यातून, पार्श्वसंगीतातून, कृतीतून हा सामाजिक पदर सिनेमा कधीच सोडत नाही, आणि तिथेच तो वेगळा ठरतो.
  4. आधुनिक मुस्लिम बाई आणि तिचा नवरा, आदिवासी मुलीची ओळखीसाठी होणारी ससेहोलपट, नॉर्थ ईस्टच्या माणसांची भारतात असलेलं स्थान, ही तीन उदाहरणंसुद्धा या सिनेमाच्या सर्वसमावेशकतेची खात्री द्यायला पुरेशी आहेत. मध्यंतरापूर्वी होणारा फुटबॉल मॅच सीक्वेन्स लाजवाब! त्यात भारताचा इतिहास, राजकारण, भेदभाव, वर्चस्ववाद या सगळ्यांचं अफलातून मिश्रण केलंय.
  5. संकलन आणि संगीत या आघाड्यांवर सिनेमा अजून उजवा असायला हवा होता एवढं नक्की वाटलं. पण तुमच्या माझ्यासारख्या ज्यांच्या ज्यांच्यात अजूनही बदलाची आशा जिवंत आहे, त्या सगळ्यांना झुंड कायम प्रेरणा देईल, याहून मोठी दुसरी गोष्ट नाही. नागराज, तुझ्या कोलाहलाला, धाडसाला आणि कल्पकतेला पुन्हा एकदा सलाम!

हेही वाचा:

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?