शिवरायांच्या सैन्यात 35% मुस्लीम बांधव होते, उद्देशांवर शंका घेऊ नका; ‘खालीद का शिवाजी’ वादावर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण
"खालिद का शिवाजी" चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी झाल्यानंतर, दिग्दर्शकांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या संख्येने मुस्लीम सैनिक होते, हे मान्य करतानाच त्यांनी अनेक संदर्भ सांगितले आहेत. रायगडावरील मशिदीचा उल्लेख आणि इतर ऐतिहासिक पुरावे सादर करून त्यांनी वादावर प्रकाश टाकला आहे. नक्की काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत हिंदू महासंघाने थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवलं आहे. यासोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनाही कायदेशीर नोटीस बजावली आली आहे. चित्रपटाच्या कथेतून शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेत चुकीचा इतिहास दाखवल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असंही या संघटनांचं म्हणणं आहे.पण आता या वादावर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मत व्यक्त केलं आहे.
दिग्दर्शक राज मोरेंची भूमिका: महाराजांच्या सैन्यात 35 % मुस्लीम बांधव होते
चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरेंनी याबाबत आता त्यांची भूमिका मांडली आहे. खालीद का शिवाजी वादावर त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटंलं की, “सिनेमाचा ट्रेलर पाहुन आमच्या उद्देशांवर शंका घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 % मुस्लीम बांधव होते आणि त्यांचे 11 अंगरक्षक देखील मुस्लीम समाजाचे होते. याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासीक कागदपत्रांच्या आधारे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कतृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती-धर्माच्या आधारावर शिरगणती केली नाही. त्यामुळे त्यांचं एकुण सैन्य किती आणि त्यांच्या एकूण सैन्यात कुठल्या जाती- धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य. आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असू शकतो किंवा कमी देखील.” असं म्हणत त्यांनी स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न केला.
अनेक मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लीमही होते
पुढे ते म्हणाले की, “आमचं म्हणणं तुमच्यातल्या काहींना पटेल आणि काहींना पटणारही नाही, आमच्या म्हणण्यावर तुमचे आक्षेपही रहातील पण छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही. या अनुशंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय. मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासीकच आहे. छत्रपती महाराजांच्या नौदलाचे प्रमुख किंवा दौलतखान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लीम छत्रपती महाराजांच्या सैन्यात होते, अर्थात ती त्या काळातील म्हणजे मध्ययुगातील परिस्थितीच होती. जसे अनेक मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लीमही होते त्यामुळे आकडे चुक असतीलही पण माहिती अनैतिहासीक नाही आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे.”
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली होती
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली होती ही गोष्ट स्पष्ट करताना मोरे म्हणाले, “मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की रायगडावर मश्जिद होती की नाही. याबाबत आपल्याला विचार करावा लागेल. 1964 साली भारत सरकारने प्रकाशित केलेल्या कुलाबा गॅझेटीयरमधे पान क्र. 928 वरील शेवटच्या परिच्छेदात रायगडावरील परिच्छेदात मश्जिदीचा उल्लेख आला आहे. यात संबंधीत वास्तुचे मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने 1962 साली प्रकाशित केलेल्या शांताराम विष्णु आवळसकर लिखित रायगडाची जीवनकथा या संशोधनात्मक पुस्तकाच्या पान क्र. 22 वर किल्लेरायगडाचा नकाशा दिला आहे त्यात महादरवाज्याच्या आत गेल्यावर डाव्या हाताला दारूच्या कोठारासमोर ‘पीर’ लिहून मश्जिदीची आकृती चितारण्यात आली आहे.
रायगडावर मुस्लीमांसाठी मशीद बांधली होती
पुढे ते म्हणाले, “अर्थात ती मस्जिद छत्रपती महाराजांनी बांधून घेतली याबाबतचा उल्लेख नागपुर विद्यापिठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख, इतिहास संशोधक प्रा.मा.मा. देशमुख लिखित मध्ययुगीन भारताचा इतिहास युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा भाग तिसरा या पुस्तकाच्या पान क्र. 51 वर ‘शिवाजीने रायगडावर मुस्लीमांसाठी मशीद बांधली होती’ असं स्पष्टपणे लिहीलेलं आहे. या पुस्तकावर आधी महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती मात्र त्या बंदी विरोधात मा. उच्चन्यायालयात स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केल्यानंतर मा. उच्चन्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवण्यात आली आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज मोरेंचे चित्रपटांवरील आक्षेपावर संदर्भासहित स्पष्टिकरण
एकंदरितच राज मोरेंनी या चित्रपटांवरील आक्षेपावर सर्व संदर्भासहित स्पष्टिकरण दिलं आहे.” येणाऱ्या 8 ऑगस्ट 2025 रोजी आमचा ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरे सुरू झालीत. या अनुशंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय होतं.तर आमच्या कलाकृतीवर प्रामुख्याने 4 आक्षेप नोंदवले गेलेत त्याबाबत आमचं हे म्हणणं आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.
महंत सुधीरदास महाराज आणि सुधीर थोरातांचा विरोध कायम
महंत सुधीरदास महाराज आणि सुधीर थोरात यांनी यावर आक्षेप कायम ठेवत म्हटलं आहे, “शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 % मुसलमान सैनिक त्यांच्या सैन्य दलात नव्हते अकरा अंगरक्षक देखील मुसलमान नव्हते. तसेच जे मुद्दे अफजल खान याच्या संदर्भात मांडले गेले ते एकदम चुकीचे आहेत. एका ट्रेलरमध्ये एवढा चुका असतील तर संपूर्ण चित्रपटात किती गोंधळ घातला असेल. इतिहासाचा विद्रूपीकरण करण्याचा हा उटील डाव महाराष्ट्र हाणून पाडेल” असं म्हणत त्यांनी विरोध कायम ठेवला आहे.