IND vs SL: टीम इंडियाविरुद्ध फक्त चार दिवस खेळवला जाणार कसोटी सामना, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. बोर्डाने सामन्यांचे दिवस कमी केले आहेत. हा निर्णय सराव सामन्यांसंदर्भात घेण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय संघ तेथील परिस्थितीशी परिचित होण्यासाठी आणि लय मिळवण्यासाठी श्रीलंका इलेव्हनविरुद्ध एक सराव सामना खेळणार आहे. या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करणाऱ्या प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने ही माहिती दिली.
संघाची घोषणा करणाऱ्या प्रसिद्धीपत्रकात, बीसीसीआयने म्हटले होते की भारतीय संघ 7 ऑगस्टपासून श्रीलंका इलेव्हनविरुद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळेल. आता क्रिकबझने असे वृत्त दिले आहे की यजमान बोर्डाने चार दिवसांचा सामना तीन दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना आता 7 ऑगस्टपासून सुरू होऊन 9 ऑगस्टपर्यंत चालेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही एका निवेदनात याला दुजोरा दिला आहे.
अहवालानुसार, बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, यामागील कारण अद्याप कळलेले नाही. हा सामना कोलंबोमधील एसएससी स्टेडियमजवळील एनसीसी मैदानावर खेळला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपणही केले जाईल. अहवालानुसार, भारतीय संघ 4 ऑगस्ट रोजी श्रीलंकेसाठी रवाना होईल. ते 7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सराव सामन्यात सहभागी होतील. यानंतर, संघ गॉलसाठी रवाना होईल, जिथे मालिकेतील पहिला सामना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल. दुसरी कसोटी 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळवली जाईल.
आता या सामन्यासाठी भारतीय संघाने संघ आधीच जाहीर केला होता. यावेळी जसप्रीत बुमराहलाही संघात स्थान देण्यात आले होते. पण हे स्थान फिटनेस टेस्टवर निर्भर होते. आता बुमराहला श्रीलंकाविरुद्ध मालिका खेळता येणार नाही. तो फिटनेस टेस्टमध्ये पास झाला नाही. यामुळे बुमराहला मालिकेतून वगळण्यात आले आहे. आता बुमराहच्या जागी संघात बीसीसीआय कोणाला जागा देते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
