“ज्या जनतेनं त्यांना स्टार बनवलं, तीच त्यांना..”; बॉलिवूडबाबत प्रकाश झा यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 13, 2022 | 12:40 PM

बॉलिवूडचे चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप का होत आहेत, याविषयी अनेक कलाकारांनी आपली मतं मांडली. यापूर्वी दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) देखील बॉलिवूडवर नाराज होताना दिसले.

ज्या जनतेनं त्यांना स्टार बनवलं, तीच त्यांना..; बॉलिवूडबाबत प्रकाश झा यांचं मोठं वक्तव्य
Prakash Jha
Image Credit source: Twitter
Follow us on

गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडचे (Bollywood) बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. चित्रपट फ्लॉप (Flop) होण्याच्या भीतीने अनेक निर्माते थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास घाबरत आहेत. बॉलिवूडचे चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप का होत आहेत, याविषयी अनेक कलाकारांनी आपली मतं मांडली. यापूर्वी दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) देखील बॉलिवूडवर नाराज होताना दिसले. जर चांगली कथा प्रेक्षकांसमोर आणता येत नसेल तर चित्रपट बनवणं बंद केलं पाहिजे, असंच ते थेट म्हणाले होते. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावरून त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा त्यांचं विधान चर्चेत आलं आहे.

प्रकाश झा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान फ्लॉप होणारे चित्रपट आणि बॉलिवूड स्टार्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “चित्रपट कलाकार आता पान-गुटखा विकतात आणि जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते दुसरीकडचे चित्रपट उचलून रिमेक बनवतात. त्यांचे पाच-सहा चित्रपट फ्लॉप झाले तरी त्याची पर्वा नाही. त्यामुळेच त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले,” अशा शब्दांत त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला.

प्रकाश झा पुढे म्हणाले की, “आता चित्रपट निर्माते आणि पटकथालेखकांनाही असं वाटू लागलंय की, बड्या स्टार्समुळे त्यांचे चित्रपट हिट होऊ शकतात. मात्र चित्रपटसृष्टी आणि तारे-तारकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्या लोकांनी त्यांना एवढ्या उंचीवर उभं केलं, तेच त्यांना खोलवर बुडवू शकतात, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

हल्लीचे बॉलिवूड कलाकार चित्रपटात विविध प्रयोग करत नाहीत, अशीही त्यांनी तक्रार केली. “बॉलिवूडचे लोक काय विचार करतात आणि काय विचार करून कंटेट लिहितात हे त्यांनाच माहीत. आता ते फक्त मोठे स्टार्सना घेऊन रिमेक चित्रपट बनवण्याच्या मागे लागले आहेत. पण तो खरा कंटेट नाही. साऊथच्या इंडस्ट्रीमधील लोक चांगल्या कथा घेऊन नवनवे प्रयोग करताना दिसत आहेत. त्यामुळेच त्यांचे चित्रपट हिट होत आहेत”, असंदेखील ते म्हणाले.