बोनी कपूर यांचा अक्षय कुमारवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाले “25-30 दिवस काम करून पैसे..”

अक्षय कुमारबद्दल असं का म्हणाले बोनी कपूर?

बोनी कपूर यांचा अक्षय कुमारवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाले 25-30 दिवस काम करून पैसे..
अक्षय कुमार, बोनी कपूर
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 08, 2022 | 3:07 PM

मुंबई- बोनी कपूर निर्मित आणि जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘मिली’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त या बापलेकीच्या जोडीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी बोनी कपूर यांनी बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्यांबद्दल त्यांना काय वाटतं, याविषयी मोकळेपणे भाष्य केलं. अभिनेता अक्षय कुमारवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

द कपिल शर्मा शोच्या एपिसोडमध्ये त्यांनी नाव न घेतला अक्षय कुमारवर निशाणा साधला. काही अभिनेते चित्रपटाची संपूर्ण फी घेतात आणि 25 ते 30 दिवसांत शूटिंग आटपतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही अभिनेत्याचं नाव घेणं टाळलं. हे कलाकार त्यांच्या तारखा, शेड्युल आणि पद्धतीनुसारच काम करतात, अशी तक्रार त्यांनी बोलून दाखवली.

“असे काही अभिनेते आहेत, ज्यांना 25-30 दिवसांत शूटिंग संपवायचं असतं आणि त्याचे पैसेही पूर्ण घेतात. सुरुवातीपासूनच त्यांचा हेतू योग्य दिसत नाही. मी इथे कोणत्याही अभिनेत्याचं नाव घेणार नाही. मात्र काही जण खूपच मोजूनमापून काम करतात. किती दिवसांचं काम आहे, सेटअप आरामदायी आहे का, अभिनेत्री चांगली हवी, दिग्दर्शक चांगला हवा अशा त्यांच्या मागण्या असतात. अशाने चित्रपट कसा चांगला बनणार”, असं ते म्हणाले.

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते जर साफ मनाने काम करत नसतील तर चित्रपट फ्लॉप होणं निश्चित असतं, असंही त्यांनी बोलून दाखवलं. “तुमची पहिली विचारप्रक्रियाच प्रामाणिक नसेल तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणारच नाही”, असं बोनी कपूर म्हणाले.

बोनी कपूर हे बॉलिवूडमधील टॉप निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी आजपर्यंत मिस्टर इंडिया, हमारा दिल आपके पास है, क्यूँ.. हो गया ना, शक्ती, पुकार यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

Follow Us