AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी

काही गाणी थेट प्रेक्षकांच्या मनात भिडतात आणि म्हणूनच कितीही वर्ष जुनं गाणं असलं तरी त्याची लोकप्रियता काही कमी होत नाही. बॉलिवूडमधील एका गाजलेल्या चित्रपटातील गाण्याबाबत असंच काहीसं घडलंय. हे गाणं आजंही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्तImage Credit source: Youtube
| Updated on: Feb 02, 2026 | 9:30 AM
Share

बॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी गाणी आहेत, जे फक्त संगीत म्हणून नाही तर प्रेक्षकांच्या भावना म्हणून वर्षानुवर्षे लोकप्रिय ठरल्या आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटातील सर्व गाणी तुफान गाजली होती. परंतु यात एक असं नऊ मिनिटांचं गाणं आहे, जे गाताना अक्षरश: गायकाच्या तोंडातून रक्त आलं होतं. या देशभक्तीपर गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे अत्यंत वेदनादायी असा किस्सा दडला आहे. हा किस्सा ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संगीतकार आणि गायक अनु मलिक यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘बॉर्डर’मधील या गाण्याची रेकॉर्डिंग पहाटेपासून सुरू होऊन थेट दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता संपली होती.

या गाण्यासाठी 20 ते 25 जण कोरस देत होते. अनु मलिक यांनी सांगितलं की गाण्याची ताल परफेक्ट बसवण्यासाठी ते स्वत: अनेकदा हे गाणं गात होते आणि ओरडत होते. यामुळे त्यांच्या घशावर खूप ताण येत होता. जेव्हा ते बाथरुममध्ये गेले आणि त्यांनी चूळ भरली, तेव्हा त्यांच्या घशातून रक्त आलं होतं. प्रचंड थकवा, ताण आणि सतत गाणं गात राहिल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली होती. अखेर त्यांना डॉक्टरांकडे जावं लागलं होतं. ‘बॉर्डर’मधील या गाण्याचं नाव ‘संदेसे आते है’ हे आहे. हेच गाणं गाताना घशावर ताण येऊन अनु मलिक यांची प्रकृती बिघडली होती.

अनु मलिक यांनी पुढे सांगितलं की रेकॉर्डिंगदरम्यान स्टुडिओमध्ये अत्यंत भावूक वातावरण होतं. गायक रुपकुमार राठोड हे गाण्यातील एका कडव्याबद्दल खूप निराश होते आणि ते चांगलं गाऊ शकणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. तेव्हा अनु मलिक यांनी त्यांना केबिनबाहेर नेलं आणि मिठी मारून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रुपकुमार राठोड खूप भावूक झाले होते आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. अनु मलिक यांनी समजावल्यानंतर त्यांनी पुन्हा रेकॉर्डिंगला सुरुवात केली आणि या गाण्याने नंतर इतिहासच रचला.

जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गाण्याला सोनू निगम आणि रुपकुमार राठोड यांनी आवाज दिला होता. यावेळी सोनू निगम इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. जे. पी. दत्ता यांना भीती होती की कदाचित इतकं मोठं गाणं कोणी ऐकणार नाही. परंतु जेव्हा हे गाणं प्रदर्शितझालं, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. थिएटरमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते. आता 29 वर्षांनंतर ‘बॉर्डर 2’ या सीक्वेलमध्ये या गाण्याला पुन्हा रिक्रिएट करण्यात आलं आहे. या सीक्वेलसाठी सोनू निगम, रुपकुमार राठोड, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांनी गाणं गायलं आहे.

Follow Us