
चेन्नईतील पल्लिकरनई डम्प यार्डमधून जात असताना एका व्यक्तीचे लक्ष जवळच पडलेल्या एका पॉलिथिनच्या पिशवीवर गेले. ती पिशवी सामान्य नव्हती. त्या व्यक्तीने हिम्मत करून पिशवीजवळ जाऊन ती उघडली, तेव्हा समोरचे दृश्य भयावह होते. पिशवीच्या वरच्या भागातून काही बोटे बाहेर दिसत होती. पिशवी उघडताच त्यात एका महिलेचा कापलेला उजवा हात आढळला. घाबरून त्या व्यक्तीने तात्काळ चेन्नई पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पिशवी तपासली, तेव्हा त्यात पायही सापडले.
त्याच दिवशी चेन्नईच्या अड्यार नदीजवळही असेच काहीसे दृश्य होते. नदीच्या काठावरून जाणाऱ्या काही प्रवाशांना एक पॉलिथिनची पिशवी दिसली. शहराच्या वेगवेगळ्या भागांत अशाच काही पिशव्या सापडल्या. काहींमध्ये आतडी, काहींमध्ये हाडे, तर काहींमध्ये कापलेले हात-पाय होते. संध्याकाळपर्यंत पोलिसांना शरीराचे अनेक तुकडे सापडले, पण डोके आणि डावा हात मात्र गायब होते. हे एका ३० ते ४० वयाच्या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे होते. यानंतर या ब्लाइंड केसच्या तपासाला सुरुवात झाली. ना चेहरा होता, ना मृतदेह पूर्ण, पण पोलिसांच्या सूक्ष्म तपासाने या हत्याकांडाचे एकेक रहस्य उलगडत गेले.
वाचा: साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!
तपासासाठी विशेष पथके
या प्रकरणाच्या तपासासाठी डेप्युटी कमिशनर मुथुस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तीन शोध पथके तयार करण्यात आली. तपास पथकाला वाटले की, विशाल डम्प यार्डमधील कचऱ्यात मृतदेहाचे आणखी काही तुकडे असू शकतात. याच कारणाने जानेवारी २०१९ मध्ये पोलिसांनी ११,७०० टन कचरा तपासला. हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि पोलिसांना धड आणि शरीराचे इतर काही भाग सापडले. मात्र, डोके आणि एक हात अद्याप गायब होते.
मृत महिलेची ओळख पटवणे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यासाठी पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत नोंदवलेल्या हरवलेल्या महिलांच्या तक्रारी तपासण्यास सुरुवात केली. पण मृतदेहाची उंची, शरीरयष्टी आणि शरीरावरील खुणा कोणत्याही तक्रारीशी जुळत नव्हत्या. मृतदेहाच्या तुकड्यांचे फोटो राज्यातील सर्व पोलीस स्टेशनांना पाठवण्यात आले. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये मृतदेहाच्या तुकड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यातून हे स्पष्ट झाले की, सर्व तुकडे एकाच महिलेचे होते. हत्येनंतर धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते.
ओळखीसाठी प्रयत्न
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी याबाबतची माहिती न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, पण याही वेळी यश मिळाले नाही. काही दिवस उलटले, तरी या ब्लाइंड मर्डर केसमध्ये कोणताही पुरावा सापडला नाही. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाच्या डाव्या हातावरील टॅटूवर लक्ष केंद्रित केले. पहिला टॅटू शिव-पार्वतीचा आणि दुसरा ड्रॅगनचा होता. या टॅटूंवरून पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. त्याचवेळी चेन्नईच्या थूथुकोडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने हरवलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवली. तिने सांगितले की, तिच्या मुलीचा गेल्या २०-२५ दिवसांपासून काहीच पत्ता नाही. तिचे नाव संध्या, वय अंदाजे ३८ वर्षे. तक्रारकर्त्याने सांगितले की, तिची मुलगी विवाहित आहे आणि ती तिच्या दोन मुलांसह आणि पतीसोबत चेन्नईच्या जाफरखानपेट येथे राहते. तिचा पती बालाकृष्णन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो.
ओळख पटली
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी संध्याच्या कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले. संध्याच्या आईने तिच्या उजव्या हातावरील टॅटू आणि शरीरावरील तीळ यावरून संध्याची ओळख पटवली. हात आणि पायाच्या तुकड्यांमध्ये काही दागिनेही सापडले, जे संध्याचेच होते. आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच कुटुंब उद्ध्वस्त झाले. ओळख पक्की करण्यासाठी मृतदेहाच्या डीएनए चाचणी करण्यात आली, जी संध्याच्या कुटुंबीयांशी जुळली. त्यानंतर तापासात पोलिसांना संध्याचा पती बाळकृष्णवर संशय आलाय. नंतर बाळकृष्णनेच संध्याची हत्या केल्याचे उघड झाले.