दुसऱ्या लग्नात फसवणूक, पुन्हा पहिल्या पतीशी करणार अभिनेत्री लग्न? म्हणाली..
दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी तिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती पतीला सोडून भारतात परतली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पूर्व पती शालीनविषयी व्यक्त झाली.

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेता शालीन भनोतला घटस्फोट दिल्यानंतर तिने गेल्या वर्षी केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर ती मुलासोबत केन्याला राहायला गेली. मात्र अवघ्या दहा महिन्यांतच ती तिच्या मुलाला घेऊन पुन्हा भारतात परतली. दलजीतने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियाद्वारे ती सतत याविषयी व्यक्त होताना दिसतेय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दलजीतने तिच्या पूर्व पतीविषयी खुलासा केला आहे. निखिलसोबत इतक्या समस्या असताना दलजीतने तिच्या पूर्व पतीकडे परत जावं, असा सल्ला एका युजरने दिला होता. त्याबद्दल सांगताना तिने शालीनवरही काही आरोप केले आहेत. मुलाच्या सर्वांत कठीण काळातही तो कधी त्याला भेटायला किंवा त्याच्याशी बोलायला आला नसल्याचं दलजीतने म्हटलंय.
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दलजीत म्हणाली, “माझ्या पूर्व पतीसोबत गेल्या वर्षभरापासून माझा काहीच संपर्क नाही. कदाचित वर्षभराहून अधिक काळ उलटला असेल. त्यानेही कधीही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आमच्यात शून्य संवाद आहे. नऊ वर्षांपर्यंत मी त्याच्यासोबत खूप चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा त्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मी जेडनला त्याला भेटू दिलं होतं. कारण हे माझ्या मुलासाठी चांगलं असेल असा मी विचार केला. याबाबतीत मी स्वार्थी होते. शालीन आणि जेडन यांची भेट झाली की मला आनंद व्हायचा. पण नंतर केन्यामध्ये आमच्यासोबत काय घडलं, त्याच्या मुलासोबत काय घडलं याविषयी त्याने जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याच्याकडे माझा नंबरही असावा, पण त्याने आजवर कॉल किंवा मेसेज केला नाही.”
“त्याला त्याच्या मुलाविषयी काळजी वाटत नाही का? नेमकं काय घडलंय हे त्याला जाणून घ्यायचं नाहीये का? याआधी तो नेहमी आमची चौकशी करायचा. इतकंच काय तर मी त्याची आणि निखिलची भेटही करून देणार होते. आमच्यासोबत केन्यामध्ये येऊन राहा, असंही त्याला म्हटलं होतं. तो फक्त हो-हो म्हणाला आणि त्यानंतर गायब झाला”, अशी तक्रार दलजीतने बोलून दाखवली.
एकीकडे दलजीतने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला, तर दुसरीकडे निखिलने तिला कायदेशीर नोटीस पाठवून केन्यातील सर्व सामान घेऊन जाण्यास सांगितलं. याविरोधात दलजीतने कोर्टाचं दार ठोठावलं होतं. दलजीने 2023 मध्ये निखिलशी लग्न केलं होतं. त्याआधी 2009 मध्ये तिने शालीनशी लग्न केलं होतं. या दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.