
डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा प्रेक्षकांनी आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यामध्ये सतत उल्लेख करण्यात आलेला ‘बडे साहब’ नेमका आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं. सोशल मीडियावर याची एवढी चर्चा झाली होती की, बडे साहबच्या भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार, याविषयी विविध अंदाज व्यक्त होऊ लागले. आता 19 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या भूमिकेवरून अखेर पडदा उचलण्यात आला आहे. ‘धुरंधर : द रिव्हेंज’मध्ये बडे साहब म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दाखवण्यात आलं आहे. अभिनेता दानिश इक्बालने ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर त्याच्याविषयी जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, दानिश त्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत दानिशने सांगितलं की, तो चित्रपटात बडे साहबची भूमिका साकारणार असल्याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली असून कित्येक तास तो मेकअपसाठी बसून असायचा. प्रोस्थेटिक मेकअपसाठी त्याला सात ते आठ तास लागायचे आणि शूटिंग संपल्यानंतर तो मेकअप काढण्यासाठी तीन ते चार तास लागायचे. दानिश म्हणाला, “दाऊदच बडे साहब असेल हे मला माहीत नव्हतं. कारण त्यावेळी अशी कोणतीच चर्चा नव्हती. मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की, मला दाऊदची भूमिका साकारायची आहे. तो अंथरुणाला खिळला असून सर्व सीन्स त्याच सेटिंगमध्ये शूट होतील.”
“मला बडे साहबच्या भूमिकेविषयी कोणतीच कल्पना नव्हती. जेव्हा स्क्रिप्टमध्ये अशा पद्धतीने त्याचं नाव समोर आलं की हमजा (रणवीर) त्याचा शोध घेतोय, तेव्हा प्रत्येकजण विचार करू लागला की बडे साहब आहे तरी कोण? कदाचित ओसामा बिन लादेन किंवा परवेज मुशर्रफ यांना बडे साहब म्हणून दाखवण्यात येईल, अशीही एक चर्चा होती. तेव्हाच मी विचार केला की दाऊदच बडे साहब आहे का? जेव्हा धुरंधरचा पहिला भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बहे साहबच्या भूमिकेविषयी जोरदार चर्चा सुरू झाली, तेव्हा मी घाबरलो होतो”, असं दानिशने पुढे सांगितलं.
‘बडे साहब’च्या भूमिकेसाठी विविध अभिनेत्यांच्या नावांची सोशल मीडियावर चर्चा होती. सलमान खान, इमरान हाश्मी अशी नावं चर्चेत होती. तेव्हा दानिशला ही भीती वाटत होती की त्याच्या भूमिकेला चित्रपटात रिप्लेस करण्यात आलं आहे. “जेव्हा बडे साहब म्हणजेच दाऊदच्या भूमिकेसाठी इतकी सर्व नावं समोर आली, तेव्हा माझ्या मनात विचार आला की दिग्दर्शक आदित्यला फोन करून विचारून घ्यावं की, त्याने मला रिप्लेस तर केलं नाही ना”, असं दानिश पुढे म्हणाला.