WTC 2027: न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा धक्का, टेस्ट चॅम्पियन्शिप स्पर्धेतून आऊट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2025-2027 स्पर्धेत इंग्लंडची सुमार कामगिरी सुरूच आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या अंतिम फेरीतून इंग्लंड संघ बाद झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं इंग्लंडचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडने 2-1 ने गमावली आणि स्वप्न भंग झाला. खरं तर या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन पराभव पचवावे लागले आणि मालिकेसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या अंतिम सामन्यातून पत्ता कट झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन पराभव आणि आयसीसीच्या दंडामुळे इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल आयसीसीने इंग्लंडवर तब्बल 12 गुणांचा दंड ठोठावला आहे. या मालिकेत एकूण 14 गुणांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे आता उर्वरित सामने हे फक्त औपचारिकता असणार आहे. कारण इतर सामन्यात विजय मिळवला तरी विजयी टक्केवारीत हवी तशी सुधारणा होणार नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप गुणतालिकेतील अव्वल दोन संघांना अंतिम फेरी खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे या दोन स्थानावर इंग्लंडचं पोहोचणं शक्य नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप गुणतालिकेत इंग्लंडची विजयी टक्केवारी 26.36 टक्के आहे. त्यामुळे उर्वरित नऊ सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. कारण अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 87.50 टक्के, तर दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 75 टक्के आहे. यात थोडंफार वर खाली झालं तरी फार काही घसरण होणार नाही. त्यात न्यूझीलंड आणि भारताला टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. इंग्लंडने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले, तर त्यांची गुणांची टक्केवारी केवळ 57.94% असेल.
भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 स्पर्धेत भारताचे नऊ सामने शिल्लक आहेत. यात श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला नऊ पैकी किमान 7 सामने जिंकणे अनिवार्य आहे. पण हे गणित पण जर तर वर असेल. दुसरीकडे, 8 सामने जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 68.52 टक्के होईल, जे अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असेल. दक्षिण आफ्रिका 75 टक्के आणि न्यूझीलंड 72.22 टक्क्यांसह सध्या भारताच्या पुढे आहेत. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी या दोनपैकी किमान एका संघाने आगामी मालिका गमावणे गरजेचे आहे. म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली तर संधी असेल. पण गमावली तर मात्र कठीण आहे.
