‘धुरंधर 2’वर ‘प्रोपेगेंडा’चा आरोप, इंडस्ट्रीतले दिग्गज अभिनेते पुढे सरसावत म्हणाले..

Dhurandhar 2 : रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट प्रोपगेंडा असल्याची टीका काही जणांकडून होत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात विविध मतमतांतरे पहायला मिळत आहेत. पियुष मिश्रा आणि बोमन इराणी याबद्दल काय म्हणाले, ते जाणून घ्या..

धुरंधर 2वर प्रोपेगेंडाचा आरोप, इंडस्ट्रीतले दिग्गज अभिनेते पुढे सरसावत म्हणाले..
रणवीर सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2026 | 3:35 PM

तुम्हाला आवडो किंवा न आवडो.. पण ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. कारण सध्या थिएटरपासून सोशल मीडियावर सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने फक्त 10 दिवसांत जगभरात तब्बल 1200 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईची त्सुनामी आणणाऱ्या या चित्रपटाबाबत दोन वेगवेगळ्या मतांचे गट तयार झाले आहेत. त्यापैकी एक गट रणवीर सिंहच्या या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक करत आहे, तर दुसरा गट त्यावर प्रोपगेंडाचा (प्रचारकी असल्याचा) ठपका ठेवत आहे. आता या चर्चेवर इंडस्ट्रीतल्या दोन दिग्गज अभिनेत्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले पियुष मिश्रा?

दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते पियुष मिश्रा आणि बोमन इराणी यांना ‘धुरंधर’बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “प्रोपगेंडा आणि सिनेमा यांच्यात अत्यंत बारिक रेष असते, धुरंधरसारखी. मला तो चित्रपट खूप आवडला. त्याचा स्क्रीनप्ले जबरदस्त आहे. तो खरा चित्रपट आहे, त्यामुळे धुरंधर खूप आवडला. तुम्ही त्याला प्रोपगेंडा म्हणू शकत नाही. तो चित्रपट आहे,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया पियुष मिश्रा यांनी दिली.

बोमन इराणी यांचं मत

“मी अद्याप धुरंधर पाहिला नाही. परंतु मला तो चित्रपट पहायला आहे, कारण खूप मोठमोठ्या लोकांनी त्याचं कौतुक केलं आहे. धुरंधर हा कमाल चित्रपट आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे तो कमाल असेलच आणि यश हा साजरा केला पाहिजे,” असं मत बोमन इराणी यांनी व्यक्त केलं.

‘धुरंधर’वर प्रचारकीची टीका होत असली तरी बॉक्स ऑफिसवर तो नवनवे विक्रम रचतोय. या चित्रपटात रणवीरसोबतच अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. भारतातील गुप्तहेर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या, गँगस्टरच्या गटात सामील होऊन कशा प्रकारे हेरगिरी करतो आणि त्यांचा खात्मा करतो, याचा थरार ‘धुरंधर’मध्ये पहायला मिळतो. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. भारतावरील दहशतवादी हल्ले, पाकिस्तानच्या ल्यारीमधील गँगवॉर.. यांचा संदर्भ त्यात पहायला मिळतो.

Follow Us