आता शिवसेना ठाकरे गटात महाभूकंप? ऑपरेशन टायगर 3.0 बाबात सर्वात मोठी बातमी, नेमकं काय घडतंय?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यानंतर सचिन आहिर यांनी देखील पक्षाची साथ सोडली, दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं, 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ही शिवसेना ठाकरे गटात पडलेली मोठी फूट आहे. दरम्यान त्यानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे. पक्षाला लागलेली ही गळती रोखण्याचं उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असतानाच आता मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन टायगर 3.0 बद्दल मोठं विधान केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
मंत्री संजय शिरसाट यांनी ऑपरेशन 3.0 बाबत मोठं विधान केलं आहे. आमचे ऑपरेशन 3.0 सुरू झालं आहे. आता महाभूकंप होणार आहे. तो कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदार फुटण्यापूर्वी देखील ते सातत्याने ऑपरेशन टायगरबद्दल बोलत होते, आणि त्यानंतर सहा आमदारांनी पक्षातून बंडखोरी केल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे, यावर शिवसेना ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे, उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलन हाती घेतलं आहे, यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी नवीन आंदोलन हाती घेतलं आहे, परंतु त्याला प्रतिसाद मिळणार नाही. मंदिरात जी चोरी झाली त्याच्यातून काही फायदा मिळतो का? म्हणून ते आंदोलन करत आहेत. दर वेळेस दुटप्पी भूमिका घेतली तर लोक साथ देत नाहीत. ज्यांनी यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठण केली त्यांना यांनी 13 दिवस जेल मधे टाकलं, आणि आता ते रामरक्षा पठण करणार आहेत, असा टोला यावेळी शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
