अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, शाळांना सुट्टी; पावसाचं संकट किती दिवस राहणार? मुख्यमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
devendra fadnavis : मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मोठी विनंती केली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि जवळच्या शहरातही पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने ठाणे, मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMRDA Region) कोसळणाऱ्या पावसाने रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. आता कोसळणारा पाऊस हा अपेक्षेपेक्षा जास्त असून येत्या 6 तारखेपर्यंत असाच पाऊस कोसळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील पावसाविषयी महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ राज्यात मुसळधार पाऊस आहे. अलर्ट दिलेला आहे. वादळ येतील. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस येण्याचा अलर्ट देत आहोत. दर तीन तासाने अलर्ट देत आहोत. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. प्रवास टाळता आला तर टाळता आला पाहिजे असं सांगितलं. वादळ आहे. काही फटका बसू नये याचा अलर्ट दिला आहे. यावेळी नीट अलर्ट देत आहोत. लोकांनी अलर्ट फॉलो करावा. त्याप्रमाणेच बाहेर पडावं, अशी माझी विनंती आहे’.
त्याबाबत योग्य काळजी घेईल : फडणवीस
दोन दिवसांपूर्वी मुंबई- पुण्यातील कनेक्टिंग लिंकवर दोन खड्डे आढळून आले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टेड आहेत, तिथे दोन खड्डे आहे. पूर्ण लिंकवर खड्डे पडले नाहीत. काही लोकांना कोणत्या गोष्टीला रेक्टिफाय करायचं, यात आनंद आहे. काम झाल्यावर पावसात दुसरी लेअर येते. त्यात आपण काही अडचणी टेस्ट करत असतो. पण हरकत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी. एमएसआरडीसी त्याबाबत योग्य काळजी घेईल. अनेक ठिकाणी केलेलं काम सेटल कराव्या लागतात. या इंजिनीअरिंग गोष्टी आहेत. कुठे कमतरता असेल तर दुरुस्त करता येईल. देशातील सर्वात उंच पूल, उंच रस्ते, डॅमच्या खाली बोगदा आपण केलं आहे. निव्वळ टीका करणं योग्य नाही’.
