Urmila Matondkar-Ram Gopal Varma : बॉलिवूडचं ‘सीक्रेट मॅरेज’! उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच मंदिरात झालं होतं लग्न ?
ज्येष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या गुप्त लग्नाचा खळबळजनक दावा केला आहे. चिरंजीवींनी केलेल्या विधानामुळे हे जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आले. आंध्र प्रदेशातील मंदिरात लग्न झाल्याचे चिरंजीवींनी सांगितले होते. उर्मिला भावूक झाली, पण लग्नाचा थेट इन्कार केला नाही, तर राम गोपाल वर्मांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बॉलिवूडमधील ही प्रेमकथा अजूनही एक गूढ आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या गाजल्या, अनेक अभिनेत्रींचं नावं कोणाकोणाशी जोडलं गेलं होतं. मात्र 90 च्या दशकामध्ये एका जोडीची चर्चा खूपच रंगली होती. ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.. त्या दोघांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असायच्या. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कधीच अधिकृतपणे भाष्य केलं नाही. असं असलं तरी, आता ज्येष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी केलेल्या एका दाव्यामुळे या जुन्या प्रेमकहाणीबद्दल पुन्हा बोललं जात आहे. ज्योति वेंकटेश यांनी उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या लग्नाचा दावा केला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं, काय दावा केला ते जाणून घेऊया.
उर्मिला-राम गोपाल वर्मा यांचं गुपचूप लग्न झालं होतं?
सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये ज्योती वेंकटेश यांनी उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितलं की, त्या काळात ते, त्या दोघांच्या नात्यावर लिहित असत, मात्र दोन्ही बाजूंनी ही बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी दबाव होता. एवढंच नव्हे तर एकदा माझी भेट अभिनेता चिरंजीवी यांच्याशी झाली. ते जेंटलमन चित्रपटाच्या कामात व्यस्त होते. तेव्हा ते मला म्हणाले “तुम्ही राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाबद्दल इतकं लिहीत असता, पण त्यांनी लग्न केलंय, हे का लिहिलं नाही?” असा सवालच चिरंजीवी यांनी विचारला.
ते ऐकून ज्योति यांनी म्हटलं की अफेअरबद्दल मला माहीत होतं, पण लग्न कधी आणि कुठे झालं ? त्यावर चिरंजीवी म्हणाले, दोघांनी आंध्र प्रदेशातील एका मंदिरात लग्न केलं होतं. इतकेच नाही तर लग्न लावून देणाऱ्या व्यक्तीचा संपर्क क्रमांकही त्यांनी दिला होता, असं ज्योति वेंकटेश यांनी नमूद केलं.
यानंतर ज्योती वेंकटेश यांनी एका मॅगझिनमध्ये दोघांच्या लग्नाची बातमी प्रसिद्ध केली. मात्र, बातमी छापण्यापूर्वी त्यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी संपर्क साधला होता. ज्योती यांच्या म्हणण्यानुसार, फोनवर उर्मिला भावूक झाली आणि रडू लागल्या. “तुम्ही मला इतक्या वर्षांपासून ओळखता, मग माझ्याबद्दल असे कसे लिहू शकता?” असं उर्मिलाने विचारलं.
त्यानंतर त्यांनी राम गोपाल वर्मा यांनाही फोन केला. मात्र, दिग्दर्शकाने या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “मला याबद्दल बोलायचे नाही,” असं त्यांनी सांगितल्याचे ज्योती यांनी म्हटलं.
का मोडलं नातं ?
पुढे ज्योती वेंकटेश यांनी सांगितलं की, उर्मिला मातोंडकर हिन कधीही लग्न झाल्याच्या बातमीला थेट नकार दिला नव्हता. ती फक्त भावूक झाली होती. त्यांच्या मते, उर्मिला हिला राम गोपाल वर्मा यांच्यासोबत कायदेशीररित्या लग्न करायचं होतं, मात्र तसं न झाल्याने, नंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
चिरंजीवीने का केला हा खुलासा?
चिरंजीवी आणि राम गोपाल वर्मा यांच्यात चांगले संबंध होते. मात्र, दोघांमध्ये काही कारणावरून मतभेद झाले असावेत आणि त्यामुळेच चिरंजीवींनी ही माहिती समोर आणली असावी, असा अंदाज ज्योती वेंकटेश यांनी पुढे बोलताना व्यक्त केला. मात्र या दाव्यांवर उर्मिला मातोंडकर किंवा राम गोपाल वर्मा यांनी आजपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ही बॉलिवूडमधील जुनी प्रेमकहाणी अजूनही एक गूढच आहे.
