दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम; त्या रात्री नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 25, 2022 | 7:50 AM

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्याने (Divya Bharti) जगाचा निरोप घेतला होता. ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती.

दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम; त्या रात्री नेमकं काय घडलं?
Divya Bharti
Follow us on

बॉलिवूडची (Bollywood Actress) सुंदर अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) हीचा मृत्यू अवघ्या जगासाठी आजही एक रहस्य आहे. तिचा चित्रपट सृष्टीतील प्रवास अल्पावधीचा होती. परंतु, कमी काळाच्या कारकीर्दीतही तिने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. 5 एप्रिल 1993 रोजी अचानक तिच्या मृत्यूची बातमी समोर आली. काहींनी तिचा मृत्यू अपघात, काहींनी आत्महत्या तर काहींनी कट रचल्याचं म्हटलं होतं. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला होता. दिव्या भारतीने 1992 मध्ये ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी तिने काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं होतं. शोला और शबनम, दिल का क्या कसूर, जान से प्यारा, दिवाना, बलराम, दिल ही तो है, दिल आशना है, गीत यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती. (Divya Bharti Birth Anniversary)

त्या रात्री नेमकं काय घडलं?

आपल्या मृत्यूच्या दिवशीच दिव्याने मुंबईत स्वतःसाठी नवीन 4 BHK घर विकत घेतलं होतं आणि घराचा करारसुद्धा अंतिम झाला होता. दिव्याने तिचा भाऊ कुणालला ही आनंदाची बातमी दिली होती. दिव्या त्याच दिवशी शूटिंग संपवून चेन्नईहून मुंबईला परतली होती. मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागातील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर दिव्या पतीसह राहत होती. तिच्या घरी रात्री 10 वाजताच्या सुमारास तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला पती श्याम यांच्यासह भेटायला आली होती. तिघं लिव्हिंग रुममध्ये बसून गप्पा मारत होते. सोबतच मद्यपानही सुरु होतं. दिव्याची मोलकरीण अमृताही गप्पांमध्ये सहभागी होती. रात्रीचे अकरा वाजले होते. अमृता काहीतरी काम करण्यासाठी किचनमध्ये गेली. नीता लुल्ला तिच्या पतीसोबत टीव्ही पाहण्यात व्यस्त होती. त्याचवेळी, दिव्या हॉलच्या खिडकीच्या दिशेने गेली आणि तिथून अमृताशी मोठ्या आवाजात बोलत होती. दिव्याच्या लिव्हिंग रुममध्ये बाल्कनी नव्हती, पण ती एकमेव खिडकी होती ज्याला ग्रिल नव्हती. खिडकीत उभी असलेली दिव्या वळली आणि तिने नीट उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र इतक्यात तिचा पाय घसरला आणि दिव्या सरळ खाली जमिनीवर पडली, असा दावा केला जातो.

पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने दिव्या पूर्णपणे रक्ताने माखली होती. तिला तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दिव्याचा मृत्यू झाला. डोक्याला झालेली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पाच वर्षे तपास करूनही पोलिसांना तिच्या मृत्यूचं कोणतंही ठोस कारण सापडलं नाही. परिणामी, ती दारूच्या नशेत असल्याने बाल्कनीतून खाली पडली, असं कारण पोलिसांच्या अहवालात नमूद केलं आहे.