लघवीत रक्त आढळलं अन्..; 12 तासांत बदललं इमरान हाश्मीचं आयुष्य, पूर्णपणे खचलेला अभिनेता

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान हाश्मी त्याच्या आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. एका सर्वसामान्य दिवसाने अचानक त्याचं आयुष्य बदललं होतं. त्यानंतर पुढील पाच वर्षे तो तणावात होता.

लघवीत रक्त आढळलं अन्..; 12 तासांत बदललं इमरान हाश्मीचं आयुष्य, पूर्णपणे खचलेला अभिनेता
Emraan Hashmi
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2026 | 1:40 PM

जवळपास दोन दशकांच्या आपल्या करिअरमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने लव्हरबॉयपासून खलनायक, गंभीर हिरोपर्यंत प्रत्येक भूमिका साकारल्या आहेत. मोठ्या पडद्यावर या भूमिका साकारण्यासाठी त्याने चांगली तयारी केली होती. परंतु पडद्यामागे त्याच्या खऱ्या आयुष्यात जे घडलं, त्यासाठी तो अजिबात तयार नव्हता. 2014 मधील एका दिवसाने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान आयुष्यातील त्या सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. हा क्षण तेव्हाचा होता, जेव्हा त्याचा छोटा मुलगा अयानला कॅन्सरचं निदान झालं होतं. तो क्षण आठवला की आजसुद्धा इमरानचं मन अस्वस्थ होतं.

इमरान हाश्मी त्याच्या आयुष्यातील या सर्वांत हृदयद्रावर क्षणाबद्दल सांगितलं. त्या क्षणाने त्याचं जग कायमचंच बदललं होतं. एक सर्वसामान्य दुपार अचानक आई-वडिलांसाठी एका वाईट स्वप्नात बदलली होती. रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये इमरानने सांगितलं, “2014 मध्ये जेव्हा माझा मुलगा आजारी पडला, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता. तो काळ मी शब्दांत मांडू शकत नाही. ते सर्व जवळपास पाच वर्षांपर्यंत चाललं होतं. एका दुपारने माझं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं.”

याविषयी तो पुढे म्हणाला, “13 जानेवारी रोजी आम्ही दुपारी जेवायला गेलो होतो. आम्ही आमच्या मुलासोबत पिज्जा खात होतो. पहिलं लक्षण त्याच टेबलावर दिसलं. त्याच्या लघवीत रक्त आढळलं होतं. पुढच्या तीन तासांत आम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये होतो. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाला कॅन्सर आहे. तुम्हाला पुढच्याच दिवशी त्याच्या ऑपरेशनसाठी त्याला रुग्णालयात दाखल करावं लागेल आणि त्यानंतर त्याच्यावर कीमोथेरपी होईल. हे सर्व ऐकून माझं आयुष्य 12 तासांच्या आता पूर्णपणे बदललं. आधी माझं आयुष्य सर्वसामान्य होतं आणि पुढच्याच क्षणी सर्वकाही बदललं.”

मुलाला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर इमरान हाश्मीसाठी पुढील पाच वर्षे खूप आव्हानात्मक आणि कठीण होती. त्याचा बराचसा वेळ रुग्णालयात जात होता. मुलाच्या उपचाराचं शेड्युल फॉलो करताना तो सतत तणावाखाली असायाचा. हा तणाव काही लगेच निवळणारा नव्हता. त्यादरम्यान इमरानच्या आयुष्यातील संपूर्ण प्राधान्यक्रमच बदलला होता. करिअर आणि यश हे सर्वकाही मागे सुटत गेलं आणि मुलाच्या आरोग्याची काळजी घेणं त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचं ठरलं होतं. या वेदनादायी अनुभवाने इमरानला नंतर एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली. अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करणाऱ्या इतर आईवडिलांची मदत व्हावी, या हेतूने त्याने हे पुस्तक लिहिलं होतं. व्यवस्थित उपचारांच्या जोरावर इमरानच्या मुलाने कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली.