फरहानचा ‘120 बहादुर’ रिलीजआधीच वादात; ‘हा’ समाज आक्रमक, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

फरहान अख्तरच्या '120 बहादूर' चित्रपट रिलीजआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाबाबत एका समुदायाने आक्षेप नोंदवला आहे. तसेच हा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे. या चित्रपटाला विरोध करत रस्त्यावर उतरून मोर्चा काढत निषेधही व्यक्त केला आहे. पण चित्रपटाला विरोध होण्याची कारणे काय आहेत जाणून घेऊयात.

फरहानचा ‘120 बहादुर’ रिलीजआधीच वादात; हा समाज आक्रमक, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी
Farhan 120 Bahadur in controversy even before its release Ahir community aggressive, demand ban on the film
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 7:45 PM

फरहान अख्तरचा आगामी चित्रपट ‘120 बहादूर’ ची चर्चा सुरु असताना आता हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. हा चित्रपट 1962 च्या भारत आणि चीनमधील युद्धावर आधारित आहे. मात्र या चित्रपटाच्या विरोधात एका समाजाने आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाच्या निषेधार्थ अहिर समुदायातील शेकडो लोकांनी संतप्त होतं रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. रविवारी (27 ऑक्टोबर 2025) गुरुग्राममधील राष्ट्रीय महामार्ग 48 वर या समाजाने पायी मोर्चा काढत रास्तारोखोही केला.

चित्रपटाला या समुदायाचा विरोध 

अहिर समुदायाने चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे नाव ‘120 बहादूर’ वरून ‘120 वीर अहिर’ करण्याची मागणी केली आहे. जर चित्रपटाचे नाव बदलले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ न देणार नाही अशी धमकीही या लोकांनी दिली आहे. रविवारी झालेल्या या निषेधामुळे राष्ट्रीय महामार्ग-48 वर एक किलोमीटरपेक्षा जास्त जाम झालेलं चित्र पाहायला मिळालं आहे.

चित्रपटाला विरोध करण्यामागील कारणे अन् मागण्या

या निषेधाबाबत एक निवेदन जारी करताना, युनायटेड अहिर रेजिमेंट फ्रंटने म्हटले आहे की, “निदर्शनादरम्यान, आंदोलक खेरकी दौला टोल प्लाझा ते दिल्ली सीमेपर्यंत चालत गेले. 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित चित्रपटाचे नाव ‘120 वीर अहिर’ असे ठेवण्याची त्यांची मागणी आहे.”

मोर्चाने आरोप केला आहे की, पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात 13 व्या कुमाऊँ रेजिमेंटच्या 120 अहिर सैनिकांच्या बलिदानाचे पुरेसे चित्रण करण्यात आलेले नाही, ज्यांनी 1962 च्या युद्धात चिनी पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) विरुद्ध लढताना लडाखमधील रेझांग ला या मोक्याच्या पर्वतीय खिंडीचे रक्षण केले होते.

चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करू

या घटनेबद्दल बोलताना, अहिर मोर्चाचे सदस्य आणि वकील सुबे सिंग यादव म्हणाले, “चित्रपटाचे नाव बदलले पाहिजे, अन्यथा आम्ही हरियाणा किंवा आमच्या समुदायाच्या कोणत्याही भागात ते प्रदर्शित होऊ देणार नाही.” ते पुढे म्हणाले, “जर चित्रपटाचे नाव ‘120 वीर अहिर’ असे बदलले नाही, तर आम्ही मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेऊन राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करू.”

मोर्चाचे स्वरुप कसे होते?

एवढंच नाही तर त्यांनी या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात आहे. रेझांग लाच्या लढाईत, 120 भारतीय सैन्याच्या सैनिकांनी अंदाजे 3000 चिनी सैनिकांना ठार मारले होते. सर्व 120 सैनिक अहिर (यादव) समुदायाचे होते. निषेधाची माहिती देताना ते म्हणाले, “निषेध मोर्चा सकाळी 11:30 वाजता अहिर रेजिमेंटच्या निषेध स्थळापासून सुरू झाला. सुमारे 19 किलोमीटर लांबीचा हा मोर्चा दिल्ली-जयपूर महामार्गावरून प्रवास करत दुपारी 4 वाजता दिल्ली-गुडगाव सीमेवरील सरहौल टोल टॅक्स येथे संपला.”

अहिर समुदायाचा विरोध लक्षात घेता चित्रपटाचे नाव बदलण्यात येणार का, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार का? हे येणाऱ्या दिवसांमध्ये समोर येईलच.

चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी होणार प्रदर्शित

दरम्यान ‘120 बहादूर’ मध्ये 120 भारतीय सैनिकांच्या असाधारण धैर्याचे वर्णन दाखवण्यात आले आहे. फरहान अख्तर मेजर शैतान सिंग भाटी, पीव्हीसीची भूमिका साकारत आहे. ज्यांनी आपल्या सैनिकांसह भारतीय लष्करी इतिहासातील सर्वात निर्णायक लढाईंपैकी एक लढताना प्रत्येक संकटाचा सामना केला. हा चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) आणि अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओ) यांनी सह-निर्मित केला आहे. 120 बहादूर 21 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.