Gondhal Oscars : धुरंधरवर मात करुन ‘गोंधळ’ हा मराठी सिनेमा ऑस्करपर्यंत कसा पोहोचला? दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दूरदृष्टीला खरचं सलाम
Gondhal Oscars : मागच्यावर्षी धुरंधर सिनेमा खूप गाजला होता. या चित्रपटाला स्टोरी होती. त्यामुळे काहींना असं वाटतं होतं की, धुरंधर किंवा दुसरा एखादा चित्रपट ऑस्करला धडक देईल. पण काल सगळ्यांनाच ‘गोंधळ’ या मराठी सिनेमाने आश्चर्याचा धक्का दिला.‘गोंधळ’ सिनेमाला ऑस्करपर्यंत नेण्यासाठी संतोष डावखर यांनी जो विचार केलेला त्याला खरच मानावं लागेल.

भारताकडून 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावखर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.‘गोंधळ’ चित्रपटामागचा जो विचार, दृष्टीकोन आहे, त्यावर संतोष डावखर बोलले. देशाबाहेरील प्रेक्षकांपर्यंत देशाची सांस्कृतिक ओळख पोहोचावी हा त्यामागे हेतू होता असं संतोष डावखर म्हणाले. सिनेमाच्या दृष्टीकोनातून भारतीय संस्कृती आणि वारसा पोहोचवण्यावर आपला प्रयत्न आहे असं डावखर म्हणाले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अनुभव या कामी आल्याचं संतोष डावखर म्हणाले. ‘गोंधळ’ चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याची आपल्याला खात्री नव्हती हे संतोष डावखर यांनी IANS शी बोलताना सांगितलं.
‘गोंधळ’ चित्रपट बनवताना संतोष डावखर यांनी एक गोष्ठ ठरवलेली. “प्रामाणिकपणे सांगतो मी हा चित्रपट लोकांना आवडेल की नाही हे मला माहित नव्हतं. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याला माझं प्राधान्य होतं” असं संतोष यांनी सांगितलं. कान्स आणि अन्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाकडे कुठल्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं हे डावखर यांना शिकायला मिळालं. चित्रपट महोत्सवांना भेट द्यायचे त्यावेळी संतोष यांच्या हे लक्षात आलं की, भारतीय सिनेमातील गरीबी, जातीयवाद या विषयांवर चर्चा केली जाते. हे महत्वाचे मुद्दे असले तरी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना भारतीय सिनेमातून सांस्कृतिक वारसा सुद्धा कळला पाहिजे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी हा सिनेमा बनवला.
15 दिवसात 40 पेक्षा जास्त सिनेमे पाहिले
कान्स आणि अन्य चित्रपट महोत्सवांमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय सिनेमांकडे कुठल्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं, त्या विषयी काय चर्चा केली जाते हे समजलं असं संतोष म्हणाले. ‘गोंधळ’ चित्रपटाने देशाची वेगळी बाजू मांडावी अशी त्यांची भूमिका होती. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक श्रीमंती त्या कथानकामध्ये यावी हे ‘गोंधळ’ चित्रपट बनवताना त्यांचा हेतू होता. भारताला एक श्रीमंत, अभिमानास्पद संस्कृती लाभली आहे. मला सिनेमाच्या माध्यमातून संस्कृतीच प्रतिनिधीत्व सादर करायचं होतं असं संतोष डावखर म्हणाले. कान्स चित्रपट महोत्सवात संतोष डावखर रोज तीन ते चार सिनेमे पहायचे. 15 दिवसात 40 पेक्षा जास्त सिनेमे पाहिले होते. जर, तुम्हाला आंतरराष्ट्रीय चित्रपट बनवायचा असेल, तर त्याची मेकिंग सुद्धा तशीच असली पाहिजे असं संतोष डावखर म्हणाले.
