आई फिरायला गेली, परत येईल.. जान्हवी कपूरला आजही श्रीदेवींची प्रतीक्षा

अभिनेत्री श्रीदेवी यांचं 2018 मध्ये निधन झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवी यांची मुलगा जान्हवी कपूर मोकळेपणे व्यक्त झाली. आईच्या निधनानंतर मी अधिक धार्मिक झाले, असं तिने म्हटलंय. त्याचसोबत दरवर्षी तिरुपतीला जाण्यामागचंही कारण सांगितलं आहे.

आई फिरायला गेली, परत येईल.. जान्हवी कपूरला आजही श्रीदेवींची प्रतीक्षा
जान्हवी कपूर, श्रीदेवी
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2024 | 1:40 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. जान्हवी आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आईच्या निधनानंतर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे आणि मी पहिल्यापेक्षा अधिक धार्मिक, काही प्रमाणात अंधविश्वासू झाली आहे, असं जान्हवीने सांगितलं. आईच्या निधनाच्या सहा वर्षांनंतर आजसुद्धा ती अचानक माझ्या आयुष्यात परत येईल असं वाटत असल्याची भावनाही जान्हवीने व्यक्त केली.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “आधी माझा काही गोष्टींवर विश्वास नव्हता. शुक्रवारी केस धुवायचे नाहीत, रविवारी काळे कपडे घालायचे नाहीत, अशा गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. मात्र आईच्या निधनानंतर मी प्रत्येक गोष्ट मानू लागले. ती गेल्यानंतर माझा दृष्टीकोन खूपच बदलला. देवाची पूजा-अर्चना यात आता माझं मन अधिक रमतं. हिंदुत्वाविषयी मी अधिक जागरूक झाली. मी पहिल्यापेक्षा जास्त धार्मिक झाली आहे. यामागे आईच कारणीभूत आहे. मला आजही वाटतं की ती कुठेतरी फिरायला गेली आहे. काही दिवसांनंतर पुन्हा घरी येईल. ती या जगात नाही, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास नाही.”

“तिरुपती बालाजी यांच्याशी माझ्या आईचं एक वेगळंच कनेक्शन होतं. तिच्या निधनानंतर मी ठरवलं की तिच्या प्रत्येक वाढदिवशी मी बालाजींच्या दर्शनाला जाईन. आजही मी तिथे जाते, तेव्हा भावूक होते. माझ्या आयुष्यातील कोणतीही मोठी गोष्ट असली तरी त्यापूर्वी मी पायऱ्या चढून बालाजींचं दर्शन घेईन, असा निर्धार केला. एखादी गोष्ट मला सहजरित्या मिळाली, तर त्या लायक मी आहे, असं मला वाटत नाही. मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. मी हे मान्य करते की इंडस्ट्रीत मला सहज संधी मिळाली, पण मला इतकी मेहनत करायची आहे की त्या संधीला मी न्याय देऊ शकेन. त्याचसोबत मला स्वत:लाही याची जाणीव करून द्यायची आहे की मी कोणा दुसऱ्याची जागा घेतली नाही. मला जे काही मिळालंय, ते माझ्या मेहनतीमुळे मिळालं आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us