Pathaan: “4-5 धर्म, प्रत्येकाचा सेन्सॉर बोर्ड आणा”, ‘बेशर्म रंग’ गाण्याच्या वादात जावेद अख्तर यांची उडी

| Updated on: Jan 10, 2023 | 12:47 PM

'पठाण'च्या वादावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले "यानिमित्त मौलवीसुद्धा सिनेमे पाहतील"

Pathaan: 4-5 धर्म, प्रत्येकाचा सेन्सॉर बोर्ड आणा,  बेशर्म रंग गाण्याच्या वादात जावेद अख्तर यांची उडी
'बेशर्म रंग' गाण्याच्या वादात जावेद अख्तर यांची उडी
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: गीतकार जावेद अख्तर यांनी ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून सुरु असलेल्या वादावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक धर्माचा वेगळा सेन्सॉर बोर्ड असायला पाहिजे, असं ते म्हणाले. ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील एका दृश्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. याच भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद सुरू झाला होता. या चित्रपटात सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला. या वादात आता जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे.

पठाणमधील काही दृश्ये आणि कपडे बदलल्याशिवाय चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली होती. मध्य प्रदेश उलेमा बोर्डानेही या चित्रपटाला विरोध केला होता.

याविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “जर त्यांना असं वाटत असेल की मध्य प्रदेशसाठी वेगळा सेन्सॉर बोर्ड असायला हवा, तर त्यांनी वेगळं होऊन चित्रपट बघायला पाहिजे. जर ते केंद्राच्या चित्रपट सर्टिफिकेशनवर नाराज असतील तर आपल्याला त्यात मधे पडायची गरज नाही. ही त्यांच्या आणि सरकारच्या मधील बाब आहे.”

हे सुद्धा वाचा

यावेळी जावेद अख्तर यांना नुकत्याच बनलेल्या धर्म सेन्सॉर बोर्डाविषयीही प्रश्न विचारला गेला. त्यावर ते पुढे म्हणाले, “मध्य प्रदेशमध्ये एक सेन्सॉर बोर्ड आहे. त्यानंतर केंद्रात वेगळा सेन्सॉर बोर्ड आहे. नेमकी समस्या काय आहे? आपल्याकडे चार-पाच महत्त्वाचे धर्म आहेत आणि त्या प्रत्येक धर्माचा वेगळा सेन्सॉर बोर्ड असायला हवा. कदाचित त्यानिमित्ताने मौलवीसुद्धा चित्रपट पाहू लागतील. करून टाका.”

नुकतीच गुरू शंकराचार्य यांनी धर्म सेन्सॉर बोर्डाची घोषणा केली. “गाणं योग्य आहे की नाही हे ठरवणारे तुम्ही किंवा आम्ही कोण? यासाठी आपल्याकडे एक एजन्सी आहे. लोकांनी सेन्सॉर बोर्डावर विश्वास करण्याची गरज आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांवर विश्वास ठेवण्याचीही गरज आहे”, असं ते ‘बेशर्म रंग’ या गाण्याच्या वादावर म्हणाले.