4.25 लाखांचा बंगला, लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई, आज यांच्या पालीमधील बंगल्याची किंमत किती?
जितेंद्र यांनी 4.25 लाख रुपयांमध्ये खरेदी केलेला भारत भूषण यांचा बंगला. बंगला पाडल्यानंतर फक्त त्यामधील लाकडे विकूनच केलेली 11.5 लाख रुपयांची कमाई. आज त्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का.

80 च्या दशकातील दिग्गज अभिनेते जितेंद्र हे केवळ आपल्या गाजलेल्या चित्रपटांसाठीच नाही तर रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठीही ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित पाली हिल परिसरातील बंगला खरेदी करण्यामागची रंजक कहाणी सांगितली आहे. हा बंगला त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते भारत भूषण यांच्याकडून केवळ 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता. आज त्याच जागेची किंमत सुमारे 450 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.
‘द रिअल्टी ड्राइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र यांनी सांगितले की, ‘बैजू बावरा’सारखा सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते भारत भूषण एका काळात गंभीर आर्थिक संकटातून जात होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना पाली हिलमधील आपला आलिशान बंगला केवळ 4.25 लाख रुपयांना विकण्याची वेळ आली होती. त्या काळाच्या आठवणी सांगताना जितेंद्र म्हणाले, ‘भारत भूषण हे त्या काळातील मोठे स्टार होते. ते स्वतः माझ्याकडे त्यांचा पाली हिलमधील बंगला विकण्याचा प्रस्ताव घेऊन आले. मी ही गोष्ट वडिलांना सांगितली. ते म्हणाले, ‘चला, आपणही एक बंगला घेऊया.’
ते पुढे म्हणाले, ‘त्याआधी आमचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय परिस्थितीत राहत होते. आम्ही आठ जण एका चाळीतील अवघ्या 20 बाय 10 फुटांच्या खोलीत राहत होतो. अखेर मी तो बंगला 4.25 लाख रुपयांना विकत घेतला. विशेष म्हणजे या व्यवहारात 3450 चौरस फुटांचा प्लॉटही समाविष्ट होता.’
नवं घर अन् पहिले चार चित्रपट ठरले फ्लॉप
जितेंद्र यांनी सांगितले की, बंगला खरेदी करून ते तेथे राहायला गेल्यानंतर त्यांच्या सलग चार चित्रपटांना अपयश आले. त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली की, आपलेही भविष्य भारत भूषण यांच्यासारखे होईल की काय. या भीतीमुळे त्यांनी तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील काळात हीच मालमत्ता त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक ठरली.
केवळ लाकडातूनच मिळाले तिप्पट पैसे
काही वर्षांनी एका डेव्हलपरने त्या जागेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला. जितेंद्र यांनी तो स्वीकारला. बंगला पाडताना त्यामध्ये वापरण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या सागवान लाकडाची विक्री करण्यात आली.
याबाबत जितेंद्र म्हणाले, ‘तुमचा विश्वास बसणार नाही, पण बंगला पाडल्यानंतर त्यातील लाकडासाठी मला 11.5 लाख रुपये मिळाले. मी संपूर्ण बंगला 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता आणि केवळ त्यातील लाकूड विकूनच मूळ खरेदी किमतीच्या जवळपास तीनपट रक्कम मिळाली.’