ज्येष्ठ विचारवंत रत्नाकर महाजन यांचे निधन, शिदोरीकार काळाच्या पडद्याआड
आणीबाणीच्या काळात सरकारविरोधात आवाज उठवणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते होते. त्यांच्या शिदोरी मासिकातील विचारांनी तरुणाईला विधायक कामासाठी नेहमी प्रेरणा दिली होती.

Ratnakar Mahajan: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी रान उठवले होते. त्यांना त्यावेळी तुरूंगवासही सहन करावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा पगडही त्यांच्यावर होता. समाजवादासोबतच त्यांनी आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रत्यक्षात आचरणात आले होते. पुरोगामी विचारांचे शिदोरी मासिकातील विचारांनी तरुणाईला विधायक कामासाठी नेहमी प्रेरणा दिली होती.
समाजवादी मुशीतील काँग्रेसचा शिलेदार
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचा जन्म 14 जून 1946 रोजी झाला. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावचे. त्यांची शेती आणि घर मात्र बाभुळगावात होते. त्यांचे शिक्षण इंदापुरमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि इथंच स्थायिक झाले. काही काळ त्यांनी नोकरीही केली. ते या काळात समाजवाद आणि गांधी विचाराने भारावले. युक्रांद-युवक क्रांती दल, सेवा दल, भारत जोडो अभियान, विद्यार्थी चळवळीत त्यांनी हिरारीने सहभाग घेतला. आणीबाणीच्या आंदोलना त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या काळात त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला.
डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन.
मनाला चटका लावणारी बातमी आहे. माझ्या वडिलांचे सक्खे मित्र आणि माझ्या बाबांसोबत आणीबाणी काळात एकत्र तुरुंगात राहिलेले त्यांचे ‘जेलमेट’ रत्नाकर काका. त्यांच्या अभ्यासूपणाबद्दल, राजकीय कारकिर्द व नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष म्हणून केलेल्या कामांबाबत…
— Asim Sarode (@AsimSarode) September 12, 2026
1986-87 काळात त्यांनी शेतकरी प्रश्न, वीज, पाणी आणि लोकांच्या मूलभूत समस्यांसाठी इंदापूर तालुक्यात पदयात्रा काढली होती. सेवा दलाच्या माध्यमातूनही त्यांनी मोठी चळवळ उभारली. त्यांच्या लोकबोधिनी या सामाजिक संस्थेच्या वतीने तरुण-तरुणीसाठी शिबिरं आयोजित करून सामाजिक प्रश्नावर त्यांचे विचार बळकट करण्याचे काम करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व निर्माण करण्याचे काम या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले. त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे पुरोगामी चळवळ राज्यात बळकट होण्यास आणि तरुणाईमध्ये समाजवाद, गांधीवादासोबतच पुरोगामी चळवळ तळागाळापर्यंत पोहचली.
काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा रमले. तिथे त्यांनी कॅबिनेट दर्जाच्या राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्ष पदावर काम केले. पुढे ते काँग्रेसमध्ये आले. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते पद त्यांना मिळाले. त्यांनी पक्षाची सडेतोड भूमिका अनेक मंचावर मांडली. पुरोगामी विचार, समाजवाद आणि गांधीवादी विचार मुद्देसुदपणे त्यांनी मांडले.
