‘कमळी’ अन् ‘सनई चौघडे’चा महासंगम; प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट, थरारक वळणं

आता या खलनायिकांच्या दुष्ट कारस्थानामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यात असावरी आणि गौतम यांचं लग्न यशस्वीपणे पार पडेल का? की या सगळ्या गोंधळात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळीसुद्धा अडकले जातील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या महासंगमात मिळणार आहेत.

कमळी अन् सनई चौघडेचा महासंगम; प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट, थरारक वळणं
लोकप्रिय मालिकांचा महासंगम एपिसोड
Image Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2026 | 3:23 PM

जेव्हा प्रेक्षकांच्या दोन लाडक्या मालिका एकत्र येतात, तेव्हा छोट्या पडद्यावर जो धमाका होतो, त्याची मजा काही वेगळीच असते. झी मराठीवरील अशाच दोन लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’ विशेष ‘महासंगम’ भागासाठी एकत्र येत आहेत. जेव्हा दोन वेगवेगळ्या मालिकांचे कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा कथेमध्ये फक्त संवाद नाही तर प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक वळणं पाहायला मिळतात. हा महासंगम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक मोठी मेजवानी ठरणार यात शंका नाही. सध्याच्या कथानकानुसार, एकीकडे ‘कमळी’ आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात भटकत आहे. तर दुसरीकडे, ‘सनई चौघडे’ मालिकेत जय आणि शर्वरी हे असावरी आणि गौतम यांच्या लग्नासाठी प्रचंड चिंतेत आहेत. अशाच एका कठीण प्रसंगात जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी यांची भेट होणार आहे. कमळी कामाच्या शोधात थेट पमाकडे पोहोचणार आहे.

जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी हे चौघे मिळून एक मोठा निर्णय घेणार आहेत. असावरी आणि गौतम यांच नाव एका ‘सामूहिक विवाह सोहळ्या’साठी नोंदवणार आहे. विशेष म्हणजे, हा सामूहिक विवाह सोहळा राजन यांनी ‘अन्नपूर्णा’ यांच्या नावाने आयोजित केला आहे. सर्व काही सुरळीत चालू असतानाच, या सोहळ्यात विघ्न आणण्यासाठी दोन मोठ्या खलनायिका अनिका आणि समायरा एकत्र येणार आहेत. या दोन्ही खलनायिका या महासंगमात एकत्र येऊन काहीतरी नवीन कट रचणार आहेत. जो कमळी आणि शर्वरी या दोघींना मोठं नुकसान पोहोचवणारं आहे.

‘कमळी’ म्हणजेच विजया बाबर ‘सनई चौघडे’सोबत महासंगम शूटचा अनुभव सांगताना म्हणाली, “आमचा हा तिसरा महासंगम आहे, पहिला तारिणी, दुसरा लक्ष्मी निवास आणि आता ‘सनई चौघडे’ टीम सोबत. खूप मजा येत आहे. राजूसरांसोबत आम्हा सर्वानाच काम करायचं होतं आणि आम्ही खूप उत्साहात होतो. महासंगम शूट करणं कठीण असतं. कारण इतके लोक असतात आणि पूर्ण 1 तासाचा भाग शूट करायचा असतो आणि त्यात उन्हाळा, टीम कमळीला सवय झाली आहे आणि आम्ही जोमाने तयार असतो. या महासंगम भागात ऋषी आणि कमळी यांच्या नात्याला काहीतरी नवीन दिशा मिळणार आहे.” कमळी आणि सनई चौघडे या मालिकांचा हा महासंगम एपिसोड 18 ते 22 मे दरम्यान रात्री 8.30 ते 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us