मराठमोळ्या अभिनेत्रीने 100 मुलींना सोपी करून दिली शाळेची वाट; नेटकऱ्यांकडून कौतुक

जिथे परिस्थितीचा डोंगर वाटेवर असतो, तिथे अशी एखादी साथ मिळाली की मुलींची पावलं शिक्षणाच्या दिशेने झपाट्याने चालू लागतात. 'कमळी' ही मालिका येत्या 30 जूनपासून दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीने 100 मुलींना सोपी करून दिली शाळेची वाट; नेटकऱ्यांकडून कौतुक
100 शाळकरी मुलींना सायकल वाटप
Image Credit source: Tv9
| Updated on: Jun 26, 2025 | 11:40 AM

मुलगी शिकली, प्रगती झाली… हे वाक्य आपल्या जिभेवर किती सहज रुळलंय. शिक्षणाचं महत्व माहीत नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अशा दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. परंतु गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्न मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती संधीची आणि प्रोत्साहनाची. हीच गरज लक्षात घेऊन मराठमोळ्या ‘कमळी’ने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमधील शाळेत जाऊन तिने 100 मुलींना सायकलींचं वाटप केलं आहे. या मुली दररोज शाळेत 8 ते 10 किमीचं अंतर कापून शाळेत येतात. त्या भागात शाळेत पोहोचायला सार्वजनिक वाहतूक म्हणजे ST बसचाच एकमेव आधार आहे. पण त्याच्याही फेऱ्या मर्यादित आहेत. त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचणं, परत येणं हे या मुलींसाठी एक दिवसभराचं आव्हान बनतं. अशा परिस्थितीत या मुलींना शाळेची वाट सोपी करायची असेल, तर एक साधन हवं होतं आणि ते साधन ठरल्या या सायकली.

आपला आनंद व्यक्त करताना विजया बाबर म्हणजेच ‘कमळी’ म्हणाली “या मुलींच्या डोळ्यांत शिक्षणाचं स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नपूर्तीमध्ये आपला खारीचा वाटा असणार आहे याचं सुख मला मिळालं. सायकल हे फक्त एक वाहन नाही, तर ती त्या मुलींच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात आहे. रोजची धावपळ, अंतर आणि अडचणी पाहिल्यावर मला जाणवलं की शिक्षणाच्या दिशेने त्यांची प्रत्येक पावलं थोडी सोपी करणं, हीच खरी साथ आहे. सायकल हातात घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं, ते पाहून डोळ्यांत नकळत पाणी आलं.”

“एक साधी सायकल त्यांच्यासाठी किती मोठा आधार ठरू शकते, हे प्रत्यक्ष अनुभवलं. शाळेपर्यंतचा लांब रस्ता आता त्यांच्यासाठी अडथळा न राहता संधीचा मार्ग बनतो आहे, हे पाहून खूप समाधान वाटतं. शिक्षण हे प्रत्येकाचं हक्काचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला गती देणं हीच कमळीची भूमिका आहे”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

या उपक्रमामागे असलेली कमळीची भावना ही केवळ एकतर्फी मदत नव्हे, तर शिक्षणाची खरी गरज आणि त्यामागचं स्वप्न ओळखणारी आहे. कारण कमळी स्वतः शिकून इथपर्यंत आली आहे आणि शिक्षणामुळे तिचं आयुष्य घडत आहे. म्हणूनच ती स्वतःच्या गावात एक महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न बाळगते, जिथे तिच्यासारख्या शिकायची जिद्द असणाऱ्या अनेक मुलींना शिकता येईल. कमळीचा हा प्रवास आणि तिचं कर्तृत्व हे केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी देखील आहे.