माझा स्तर इतका खालावलेला..; ‘या’ मोठ्या दिग्दर्शकांवर कंगना राणौत यांनी साधला निशाणा

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रॅपिड फायर राऊंडदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्या बॉलिवूडच्या काही दिग्दर्शकांवरच भडकल्या. नेमकं काय घडलं, ते सविस्तर वाचा..

माझा स्तर इतका खालावलेला..; या मोठ्या दिग्दर्शकांवर कंगना राणौत यांनी साधला निशाणा
कंगना राणौत
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 3:12 PM

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाच्या कंगना यांनी यावेळी दिग्दर्शक करण जोहर, अनुराग कश्यप आणि आदित्य चोप्रा यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कंगना यांनी फक्त त्यांच्या पसंतीवरच प्रश्न उपस्थित केले नाही तर स्टारकिड्सबद्दल त्यांचे जुने विचार कायम ठेवले. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे करण जोहरसोबतचं कंगना यांचं जुनं शत्रुत्वही चर्चेत आलं आहे. ‘न्यूज 18 रायजिंग भारत समिट’दरम्यान कंगना यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अनुराग कश्यप, करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यापैकी सर्वोत्तम दिग्दर्शक कोणाला मानता, असा हा प्रश्न होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना कंगना यांनी कोणाचंही नाव घेताच थेट प्रश्न विचारण्याची खिल्ली उडवली. अभिनय आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत माझा स्तर इतका खालावलेला नाही, असं त्या म्हणाल्या. प्रश्न विचारणाऱ्यालाच सुनावत कंगना यांनी पुढे म्हटलं, “किमान माझ्यासमोर चांगल्या नावांची तरी यादी ठेवायला पाहिजे होती.” त्यानंतर त्यांना बॉलिवूडच्या तीन ‘खान’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. सलमान, शाहरुख आणि आमिर.. यापैकी मित्र म्हणून तुम्ही कोणाला निवडणार, असा सवाल करण्यात आला. त्यावर आश्चर्य व्यक्त करत कंगना यांनी विचारलं, “हे कधीपासून माझे मित्र बनले?” पुढे कंगना यांनी सलमानचा उल्लेख करत तो ‘कूल’ असल्याचं म्हणाल्या.

बॉलिवूडची नवी पिढी आणि घराणेशाही यांवर कायम टीका करणाऱ्या कंगना यांना जेव्हा अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्यापैकी उत्तम अभिनेत्रीला निवडण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी हसत अनन्याचं नाव घेतलं. परंतु कंगना यांच्या हसण्याच्या अंदाजावरून हे स्पष्ट होतं की त्यांनी त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही.

कंगना आणि करण जोहर यांच्यातील वाद फार जुना आहे. 2017 मध्ये कंगना यांनी करण जोहरच्याच चॅट शोमध्ये त्याला घराणेशाहीवरून टोमणा मारला होता. करण इंडस्ट्रीत बाहेरून येणाऱ्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि फक्त स्टारकिड्सना प्रमोट करतो, असा आरोप कंगना यांनी केला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे.

Follow Us