तो दिवस येऊ देऊ नका..; संजय कपूरच्या 30000 कोटींच्या संपत्ती वादात सुप्रीम कोर्टाचे निर्देश

करिश्मा कपूरचा पूर्व दिवंगत पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून चर्चेसाठी मधस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे.

तो दिवस येऊ देऊ नका..; संजय कपूरच्या 30000 कोटींच्या संपत्ती वादात सुप्रीम कोर्टाचे निर्देश
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे कुटुंबीय
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 07, 2026 | 3:56 PM

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व दिवंगत पती संजय कपूरच्या प्रॉपर्टीवरून आणि आरके फॅमिली ट्रस्टवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजय कपूरचं गेल्या वर्षी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं होतं. तेव्हापासून त्याच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कुटुंबीयांमध्ये वाद सुरू आहे. संजयच्या संपत्तीवरून आई राणी कपूर, पूर्व पत्नी करिश्मा कपूर, करिश्मा-संजयची दोन मुलं आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर आमने-सामने आहेत. हा वाद आता संवाद आणि परस्पर संमतीने सोडवला जाऊ शकतो, अशी आशा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. संजय कपूरची आई राणी कपूर आणि पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यात सुरू असलेली मध्यस्थीची प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

मध्यस्थीच्या माध्यमातून चर्चा

न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर मध्यस्थीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. खंडपीठाने या अहवालावरून म्हटलंय, “मध्यस्थीची प्रक्रिया आतापर्यंत सहा सत्रांमध्ये पार पडल्याची नोंद आम्ही घेतली आहे. मध्यस्थाने कुटुंबातील सर्व सदस्यांशी संवाद साधला आहे. ही मध्यस्थी समाधानकारकपणे पुढे जात असल्याचं पाहून आम्हाला आनंद आहे. सर्व पक्ष सहकार्य करत आहेत, याचाही आम्हाला आनंद आहे.” सर्वोच्च न्यायालयाने आरके फॅमिली ट्रस्ट वादातील मध्यस्थीचा कालावधी 2 नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. “मध्यस्थीचा अहवाल पाहिल्यानंतर सर्व पक्ष सकारात्मक तोडग्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचं दिसतंय”, असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला आहे.

मध्यस्थी अयशस्वी ठरली तर काय?

या मध्यस्थाचे शुल्क आरके फॅमिली ट्रस्टने भरावेत, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. जर मध्यस्थी अयशस्वी ठरली, तर पक्षकारांना कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याची परवानगी दिली जाईल. परंतु अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच हा वाद सामंजस्याने सोडवला जाईल, अशी आशा न्यायालयाने व्यक्त केली आहे. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं आणि 2016 मध्ये ते विभक्त झाले. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी प्रिया कपूर आणि करिश्मा कपूरच्या मुलांमध्ये संपत्तीच्या हक्कावरून वाद निर्माण झाला आहे.

आरके फॅमिली ट्रस्टचा वाद

संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी असा आरोप केला आहे की 2017 मध्ये आरके फॅमिली ट्रस्ट हा त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय स्थापन करण्यात आला होता. कुटुंबाची मालमत्ता त्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. हा ट्रस्ट बरखास्त केला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे प्रिया कपूरचं म्हणणं आहे की या ट्रस्टची स्थापना नियमांनुसार करण्यात आली होती. हे प्रकरण चिघळल्याने हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने दोन्ही पक्षांमधील वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा मार्ग निवडला. सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे.

“दोन्ही पक्षांनी मोकळ्या मनाने मध्यस्थाकडे जावं आणि ते कोणत्याही दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर वादात अडकणार नाहीत याची खात्री करावी. मध्यस्थी पुढे चालू द्या, आम्ही दुसऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा करू. जर मध्यस्थी अयशस्वी झाली, तर आम्ही तुम्हा सर्वांना कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याची परवानगी देऊ, पण तो दिवस येऊ देऊ नका”, असंदेखील कोर्टाने नमूद केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us