कपूर घराण्याच्या सूनांना सक्तीने सोडावं लागलं करिअर? करिश्माने सांगितलं सत्य

कपूर घराण्यातील सूनांना लग्नानंतर काम करण्याची परवानगी नव्हती का, असा प्रश्न कॉमेडियन झाकीर खानने अभिनेत्री करिश्मा कपूरला विचारला. त्यावर करिश्माने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. 'आपका अपना झाकीर' या कार्यक्रमात करिश्माने हजेरी लावली होती.

कपूर घराण्याच्या सूनांना सक्तीने सोडावं लागलं करिअर? करिश्माने सांगितलं सत्य
Karisma Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 01, 2024 | 12:02 PM

कॉमेडियन झाकीर खानच्या ‘आपका अपना झाकीर’ या शोमध्ये ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या चौथ्या सिझनमधील परीक्षक पाहुणे म्हणून पोहोचले होते. अभिनेत्री करिश्मा कपूर, कोरिओग्राफर गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या तिन्ही सेलिब्रिटींसोबतचा हा एपिसोड अत्यंत धमाल आणि विनोदांनी भरलेला होता. या एपिसोडमध्ये झाकीरने करिश्माला अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. “कपूर घराण्यातील महिलांवर काम करण्याबाबत काही बंधनं होती का”, असा सवाल त्याने करिश्माला विचारला. त्यावर करिश्माने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

“मला अभिनय क्षेत्रात परवानगी होती की नाही या सर्वांची अनेकदा चर्चा झाली. जेव्हा माझ्या आईचं लग्न झालं, नीता काकींचं लग्न झालं, तेव्हा त्यांनी हा पर्याय निवडला की त्यांना घराकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे. करिअरमध्ये बऱ्यापैकी काम केल्यानंतर त्यांनी मुलंबाळं, घर यांचा विचार केला. ही पूर्णपणे त्यांची निवड होती. त्याचप्रमाणे शम्मी काका आणि शशी काकांच्या ज्या पत्नी होत्या, गीता बालीजी आणि जेनिफर काकी.. यांनी लग्नानंतरही काम केलंय. त्यामुळे कपूर घराण्यात लग्नानंतर महिलांना काम करण्याची परवानगी नाही, या चर्चा खोट्या आहेत. असं काहीच नव्हतं”, असं करिश्मा म्हणाली.

करिश्मा पुढे असंही म्हणाली की तिला अभिनयात काम करण्याची आवड होती म्हणून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं. बहीण करीना आणि भाऊ रणबीर कपूर यांच्याही बाबतीत तेच होतं. त्या दोघांनाही अभिनयाची आवड होती. पण रणबीरची बहीण रिद्धिमाला अभिनयात फारसा रस नव्हता. म्हणून तिने या क्षेत्रात पाऊल ठेवलं नाही, असं करिश्माने सांगितलं. “माझ्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीने मला काम करण्यापासून रोखलं नाही”, असं करिश्माने स्पष्ट केलं.

करिश्मा कपूरने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. करिश्माने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला असून त्यावेळी ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारही पटकावले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us