‘द केरळ स्टोरी 2’ला मुख्यमंत्र्यांचा तीव्र विरोध; म्हणाले “संमतीने होणाऱ्या लग्नाला..”
The Kerala Story 2: बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराविषयीचा मुद्दा मांडणाऱ्या 'द केरळ स्टोरी 2' या चित्रपटावर केरळच्याच मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. हा चित्रपट केरळची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा हा सीक्वेल आहे. तेव्हासुद्धा या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘राज्याच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी धोका’ असल्याचं म्हटलं आहे. विजयन यांनी या चित्रपटाला ‘विषारी’ असं म्हणत इशारा दिला आहे. केरळच्या धार्मिक सौहार्दाच्या परंपरेला हा चित्रपट हानी पोहोचवू शकतो, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय समाजवादी पार्टीचे नेते आणि अभिनेत्री आयशा टाकियाचे सासरे अबू आझमी यांनीही चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. असे चित्रपट देशातील मुस्लिमांना दुखावतात, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘द केरळ स्टोरी 2’चा वाद वाढत असतानाच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिलं आहे.
काय म्हणाले केरळचे मुख्यमंत्री?
“देशाला हे समजलंय की खोटेपणा, द्वेष आणि केरळविरोधी प्रचाराने भरलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट जातीयवादी हेतूंनी बनवण्यात आला होता. त्यानंतर आता दुसरा भागसुद्धा बळजबरीने धर्मांतराच्या घटनांचं चित्रण करतो. समाजात फूट पाडण्यासाठी आणि द्वेष पसरवण्यासाठी बनवण्यात आलेल्या विषारी कामाला पब्लिक स्क्रिनिंगची परवानगी का देण्यात आली? विशेषकरून तेव्हा, जेव्हा ‘बीफ’सारख्या चित्रपटांना फक्त शीर्षकामुळे चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शनापासून रोखण्यात आलं होतं. ते परस्पर संमतीने होणाऱ्या विवाहांनाही जातीयवाद आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचं उदाहरण म्हणून दाखवून खोटा प्रचार करत आहेत”, असं केरळचे मुख्यमंत्री म्हणाले.
याविषयी ते पुढे म्हणाले, “केरळमध्ये जातीय दंगली होत नाहीत आणि समुदायांवमध्ये परस्पर आदराची भावना आहे. त्यामवुळे अशा काही शक्ती केरळच्या विरोधात आहेत. असे चित्रपट या प्रदेशातील शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक सौहार्दाची भूमी, कायदा-सुव्यवस्था राखण्यात एक आदर्श असलेल्या केरळला दहशतवादाचं केंद्र म्हणून चित्रित करण्याचे प्रयत्न आपण एकत्रितपणे नाकारले पाहिजेत. सत्याचा नेहमीच विजय होईल.”
मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं, त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘द केरळ स्टोरी’वर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलं होतं.
