
सोशल मीडियासह सर्वत्र ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावलकर ही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असून बिग बॉस मराठीच्या सीझनमध्येही तिने हजेरी लावली होती. अंकिता ही मूळची कोकणची असून ती ओळख ती मानाने मिरवते. अनेकदा अंकिता ही सामाजिक विषायंवर रोखठोकपणे भूमिका मांडते, तिची मतं शेअर करते. हीच अंकिता आता सध्या खूप भडकली असून एक खास व्हिडीओ शेअर करत तिने नेहमीप्रमाणे निर्भीडपणे तिने मतं मांडली आहेत. यावेळी तिने नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढीगाचा मुद्दा उपस्थित केला असून त्यावरून तिने टीकेची झोड उठवली आहे. या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आला आहे, पण त्याच्या जवळच कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य असून प्लास्टिकच्या पिशव्या, घाण देखील साचलेली आहे. हाच व्हिडीओ दाखवत अंकिता संतापली असून तिने त्यावर रोखठोक शब्दांत भूमिका मांडली आहे.
काय म्हणाली अंकिता ?
अंकिताने एक लाबलंचक पोस्ट तर लिहीली आहेच, पण त्यासोबत तिने तिचे विचारही स्पष्ट शब्दांत मांडले आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता म्हणाली की, “सोशल मीडियावर जर कोणी म्हटलं की, शिवाजी पार्कला हा इव्हेंट होतोय तर आपण त्यांना लगेच सुधारतो आणि म्हणतो ए.. छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा, कारण, आपल्या प्रत्येकाच्या मनात महाराजांबद्दल एक अभिमान आहे. पण, खरोखर आपण तो अभिमान जपतोय का? असं म्हणते तिने व्हिडीओ दाखवला. ” हे आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार… नांदगाव, इथे असा कचरा केलाय. मला एक सांगा आज महाराज असते तर, ते आज या प्रवेशद्वारातून येऊ शकले असते का? आपण त्यांना येऊ दिलं असतं का? ज्याठिकाणी आपण इतिहासाचं नाव लावतोय जर त्याठिकाणचं सौंदर्य आपल्याला राखता येत नसेल तर, ते नाव लावताय कशाला?” आता मला काही लोकंसांगतील की, मग तू जाऊन हे साफ कर ना, त्यांना मला एकच सांगायचंय की कचरा न करणं, कचरा होऊ न देणं आणि ज्याठिकाणी महाराजांचं नाव लागतंय त्या जागेचं पावित्र्य जपणं हीच खरी शिवप्रेमींची ओळख आहे. जर, हे जमत नसेल तर त्याठिकाणी महाराजांचं नाव वापरूच नका. गेले कित्येक दिवस मी हे रोज बघतेय. पण तो कचरा कोणच साफ करत नाहीये.” असं म्हणत अंकिताने तो व्हिडीओ शेअर केलाय.
अंकिताची पोस्ट काय ?
गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजुबाजूच्या जागांमध्येही असतो.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी “शिवाजी महाराज चौक”, “शिवाजी महाराज गेट” अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं.
किती विसंगती आहे ही– एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा! हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे.
शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त, आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे.
मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू – तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का?
आज गरज आहे ती फक्त “शिवप्रेम” बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची.
“गेटवर महाराजांचं नाव,
पण समोर कचरा –
हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा?”
आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू, तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक – सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं.
शिवरायांचं नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान.
तो आपल्या कृतीनं दाखवूया!
महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर कचरा दिसणं, हे आपण सर्वांनी विचार करावा अशी गोष्ट आहे.
स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे – हीच खरी शिवप्रेमाची खरी ओळख. – अशी भलीमोठ्ठी पोस्ट लिहीत अंकिताने या विषायवर संताप व्यक्त केला असून त्यावर हजारो लाईक्स व कमेंट्स आल्या आहेत. मांडलेला मुद्दा एक नंबर आहे….पटलं मला,जेवढ्या मनाने महाराजांविषयी नावावरून भांडण करता त्याच प्रमाणे ते जपलं पाहिजे, असे एकायूजरनेलिहीत अंकिताच्या पोस्टला अनुमोलूाीदन दिलंय.