Uravshi Rautela : क्रिती सॅननच्या ‘त्या’ लूकवरून वाद काही थांबेना; कंगनानंतर उर्वशीही मैदानात, म्हणाली…
अभिनेत्री क्रिती सॅननच्या रक्षाबंधन जाहिरातीतील पेहरावावरून सुरू झालेला वाद काही शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. कंगना रानौतनंतर आता उर्वशी रौतेलाने तिच्यावर निशाणा साधत, कपड्यांवरून काही सवाल उपस्थित केलेत. काय म्हणाली उर्वशी ?

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti sanon) एका जाहिरातीत झळकली, रक्षाबंधनानिमित्त करण्यात आलेल्या या जाहिरातीवरून मोठ रान पेटलं. त्यातील तिच्या कपड्यांवरून बराच गदारोळ झाला. वाढता वााद पाहून अखेर त्या ब्रँडने ती जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या प्लॅटफॉर्वरून ती जाहिरात हटवण्यात आली. मात्र ती जाहिरात हटवूनही क्रितीच्या कपड्यांवरून सुरू झालेला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आधी अभिनेत्री कंगना रानौतने (Kangna Ranaut) क्रितीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही (Urvashi Rautela) राखीच्या जाहिरातीत ब्रालेट घालणाऱ्या क्रिती सेननवर टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाली उर्वशी ?
एका न्यूज एजन्सीशी संवाद साधताना उर्वशी या विषयावर बोलली. क्रिएिटिव्हिटीच्या नावाखाली सांस्कृतिक भावना दुखावणं योग्य नाही, असं मला वाटतं. पेहराव किंवा त्यांच्या कपड्यांवरून मी कोणालाही जज करत नाही. मात्र, स्वातंत्र्य आणि क्रिएटिव्हिटीचा आनंद घेत असताना आपण काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचx आहे. कोणत्याही ब्रँडचा प्रचार असला तरी रक्षाबंधन हा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषय आहे” असं उर्वशी म्हणाली.
“कोट्यवधी भारतीय रक्षाबंधनाचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळे क्रिएटिव्हिटी करताना रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेणं आवश्यक आहे. क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली अशा परंपरांशी खेळ करणं योग्य नाही” असंही मत उर्वशीने या विषायवरून मांडलं.
महिलांबाबत काय म्हणाली उर्वशी ?
महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना उर्वशी पुढे म्हणाली, “ मी भारतीय संस्कृतीचा खूप आदर करते. भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन हा अतिशय सुंदर सण आहे. त्यामुळे काही गोष्टींसाठी एक मर्यादा निश्चित असणं गरजेचं आहे. महिलांना स्वातंत्र्य आहे, त्या सक्षम आहेत आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, स्वातंत्र्यासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव असणेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्या देशाच्या संस्कृतीचा व परंपरांचा आदर केला पाहिजे.” असं ती म्हणाली.
हे सगळं बोलताना उर्वशीने जरी क्रितीचं थेट नाव घेतलं नसलं तरी तिच्या या वक्तव्याचा अप्रत्यक्ष संबंध क्रितीच्या कपड्यांशी जोडला जात आहे. तिने क्रितीच्या लूकवर सूचकपणे टोमणा मारल्याची चर्चा सुरू आहे.