माधुरीचं ब्लॉकबस्टर गाणं, जे ऐकताच आजही मनाला मिळते शांतता, इतकं लोकप्रिय की..
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचं सर्वात सुंदर आणि लोकप्रिय गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. प्रियकराच्या आठवणीत रडलेली माधुरी. याच गाण्याचे पुढे प्रदर्शित झाल्या तीन आवृत्त्या.

हिंदी चित्रपटापासून प्रादेशिक चित्रपटांपर्यंत एखादा चित्रपट किंवा गाणं लोकप्रिय ठरलं की त्याच नावावर नवनवे प्रयोग करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. मात्र एकाच गाण्याच्या वेगवेगळ्या काळातील तीन आवृत्त्या तयार होणं ही काहीशी खास बाब आहे. असंच एक गाणं म्हणजे ‘सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम’. या गाण्याची सर्वाधिक लोकप्रिय आवृत्ती अभिनेत्री माधुरी दीक्षितवर चित्रित झाली आणि तिच्या भावपूर्ण अभिनयामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश रोशन दिग्दर्शित ‘कोयला’ चित्रपटात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित ही जोडी झळकली होती. अॅक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटात ‘सांसों की माला’ या गाण्याने कथेला भावनिक स्पर्श दिला.
गाण्यादरम्यान माधुरी झालेली भावूक
या गाण्याला कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला होता. संगीत राजेश रोशन यांचं तर गाण्याचे बोल इंदीवर यांनी लिहिले होते. कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील वेदना आणि भावनिक गाण्याला एक वेगळीच खोली मिळाली. ‘कोयला’च्या साउंडट्रॅकमध्ये हे गाणं तब्बल 6 मिनिटे 48 सेकंदांचं आहे.
गाण्यात माधुरी दीक्षित आपल्या प्रियकराच्या आठवणीत भावूक होताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव, नृत्य आणि डोळ्यांतील वेदना यामुळे हे गाणं पडद्यावर अक्षरशः जिवंत झालं. गाण्यादरम्यान माधुरी भावूक होऊन रडताना दिसते आणि तिचा हा अभिनय पाहून थिएटरमधील प्रेक्षकही भावुक झाले होते. त्यामुळे ‘सांसों की माला’ हे केवळ एक गाणं न राहता ‘कोयला’मधील एक अविस्मरणीय भावनिक प्रसंग ठरलं.
नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातलं मूळ गीत
विशेष म्हणजे ‘सांसों की माला’चं सर्वात पहिलं आणि मूळ रूप उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात ऐकायला मिळालं. त्यांच्या सूफी गायकीने या गाण्याला वेगळी ओळख मिळवून दिली. पुढे राहत फतेह अली खान यांनी नुसरत फतेह अली खान यांना श्रद्धांजली अर्पण करत हे गाणं पुन्हा सादर केलं आणि ते नव्या पिढीपर्यंत पोहोचलं.