“निळू फुलेंच्या भेटीवेळी अनुपम खेर पहिल्यांदा मनातून उतरले, आता…” शेतकरी आंदोलनावरुन मराठी दिग्दर्शकाचा निशाणा

| Updated on: Feb 04, 2021 | 12:38 PM

अनुपम खेर यांनी परदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला दिल्याने महेश टिळेकर खवळल्याचे दिसत आहे (Mahesh Tilekar Anupam Kher )

निळू फुलेंच्या भेटीवेळी अनुपम खेर पहिल्यांदा मनातून उतरले, आता... शेतकरी आंदोलनावरुन मराठी दिग्दर्शकाचा निशाणा
निळू फुले आणि अनुपम खेर
Follow us on

मुंबई : दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या भेटीनंतर अनुपम खेर मनातून पहिल्यांदा उतरले होते. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा द्यायला स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून अनुपम खेर हा किती मोठा कल्लाकार आहे ते समजलं, असं म्हणत प्रसिद्ध मराठी निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी आंदोलनावरुन भारतीय कलाकार, क्रिकेटपटूंपासून परदेशी कलाकारांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केली आहेत. मात्र अनुपम खेर यांनी परदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला दिल्याने टिळेकर खवळल्याचे दिसत आहे. (Mahesh Tilekar slams Anupam Kher over Silence on Farmer Protest)

“सिनेसृष्टीतील मुखवट्यामागचे खरे चेहरे आणि खायचे-दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही. संधीसाधू असणारे आणि लोकांच्या प्रेमामुळे मोठ्या झालेल्या काही कलाकारांचे खरे रुप वेळोवेळी माझ्या पाहण्यात आले आहे. लोकांचं प्रेम मिळून लोकप्रिय यशस्वी झालेल्या या काही कलाकारांची अवस्था आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरासारखी असते. मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो, तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांकडून कौतुक होते, वाहवा मिळते, म्हणून मोर खुश असतो. पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग (मागचा भाग) हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. काहीशी अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे असं मला वाटतं. अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे” असं महेश टिळेकरांनी लिहिलं आहे.

“अनुपम खेरनी तापलेल्या तव्यावर भाकऱ्या भाजल्या”

“हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला ते निळूभाऊ फुले यांच्या एका भेटीनंतर. निळू फुले यांनी अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेल्या सारांश या हिंदी सिनेमात काम केले होते. सारांश सिनेमाला 25 वर्ष झाली म्हणून एका कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते/ त्यासाठी निमंत्रण द्यायला अनुपम खेर पुण्यात निळू फुले यांना भेटले. त्यावेळी एका मोठ्या आजारामुळे निळू भाऊंची प्रकृती उत्तम नसल्यामुळे आणि शरीर साथ देत नसल्यामुळे ते घराबाहेर पडत नसत, की कोणाला फारसे भेटतही नव्हते. अनुपम खेर यांनी निळू भाऊंना भेटून काढलेले फोटो आणि बातम्या जेव्हा मुंबईच्या काही पेपरमध्ये आल्या, त्या वाचून अनुपम खेरने तापलेल्या तव्यावर किती भाकऱ्या भाजल्या ते समजले. फिल्म इंडस्ट्रीपासून अज्ञातवासात गेलेल्या ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांना अनुपम खेरने शोधून काढले अश्या आशयाच्या बातम्या आणि त्यात अनुपम खेर यांनी किती कसे कष्ट घेतले निळूभाऊंना शोधायला त्याचे रसभरून वर्णन होते” असे टिळेकरांनी लिहिले आहे.

“अण्णांच्या वाऱ्यालाही उभे राहिले नाहीत”

“अण्णा हजारे यांच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला अनुपम खेर स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून हा किती मोठा कल्लाकार आहे ते समजलं. तिथे जमलेला अफाट जनसमुदाय, प्रेस मीडिया यांच्यासमोर स्वतःची लाल करुन अण्णा हजारेंबद्दल कळवळा दाखवणारा हा संवेदनशील कलाकार, दिल्लीत शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला किंवा साधं भेटायला जाण्याचं धाडस का दाखवत नाही? का तो आता एका पक्षाचा कुणीतरी आहे म्हणून सोयीप्रमाणे भूमिका बदलली याने? अण्णा हजारे यांना दिल्लीत जाऊन पाठिंबा देताना देशभरात अण्णांची हवा होती, पण हीच हवा कालांतराने निघून गेल्यावर अनुपम खेर नंतर कधी अण्णांच्या वाऱ्यालाही उभा राहिला नाही की त्यांची भेट घ्यायला राळेगणसिद्धी गावी गेल्याचे ऐकिवात नाही. आता मात्र शेतकरी आंदोलनाच्या धगधगत्या आगीवर इतर देशातील कलाकारांनी ट्विट केलं म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती जेव्हा इतर देशातील एखाद्या घटनेबद्दल ट्विट करुन मत व्यक्त करते, तेव्हा अनुपम खेर ते वाचून का नाही टिव टिव करत? अनुपम खेर कलाकार म्हणून ग्रेट आहे पण माणूस म्हणून किती ….. आहे ते आता चांगलंच समजलं” अशी बोचरी टीका महेश टिळेकर यांनी केली आहे.

अनुपम खेर अब तेरी खैर नही
सिनेसृष्टीतील मुखवट्या मागचे खरे चेहरे आणि खायचे दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या…

Posted by Mahesh Tilekar on Wednesday, 3 February 2021

पॉपस्टार रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा, समाजसेविका ग्रेटा थर्नबर्ग यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर अनुपम खेर यांनी भारताच्या अंतर्गत प्रकरणात लक्ष न घालण्याचा सल्ला दिला होता. (Mahesh Tilekar slams Anupam Kher over Silence on Farmer Protest)

संबंधित बातम्या :

मोदी सरकारविरोधात जगातल्या प्रसिद्ध पॉपस्टारचं ट्विट, इंटरनेट बंदीवर सवाल, कोण आहे रिहाना?

कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का !

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, ‘हे तर बीसीसीआयचे काम!’

(Mahesh Tilekar slams Anupam Kher over Silence on Farmer Protest)