‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत मोठा ट्विस्ट, या प्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे. या मालिकेत लवकरच नवा अध्याय सुरू होणार आहे. नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत मोठा ट्विस्ट, या प्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री
Isha Keskar
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 16, 2025 | 9:13 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राच्या या लोकप्रिय मालिकेत लवकरच नवा अध्याय सुरु होतोय. नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपितं मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी. रुग्णांची सेवा करायला तिला आवडतं म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडलंय. या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार असून जवळपास चार वर्षांनंतर ती मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना नक्षत्रा म्हणाली, “माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेने झाली होती. त्यामुळे टीव्ही हे लाडकं माध्यम आहे. प्रेक्षकांच्या जगात पुन्हा यायला मिळतंय याचा आनंद आहे. सुकन्या पाटील हे पात्र मी साकारणार आहे. सुकन्या या पात्राविषयी ऐकताक्षणीच ते मला भावलं. सुकन्या आणि माझा स्वभाव बराच मिळताजुळता आहे. सुकन्या अत्यंत सकारात्मक आहे. तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे. सुकन्या प्रमाणेच मी देखिल माझ्या आयुष्यात जे काही चांगलं-वाईट घडतं ते देवावर सोडते.”

“छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि नेहमी हसमुख असणाऱ्या सुकन्याच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहेत. मला मिळालेलं आयुष्य भेट आहे, हक्क नाही असं तिचं मत आहे. ती स्वतःच्या भूतकाळाला कधीच कोणासमोर उघड करत नाही. तिच्या मते मी कोण आहे यापेक्षा, मी आज काय करते हे महत्त्वाचं आहे. सुकन्याचा भूतकाळ नेमका काय आहे? मालिकेची गोष्ट पुढे जाताना सुकन्याच्या येण्याने नेमकं काय घडणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे,” असं ती पुढे म्हणाली. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत इशा केसकर, अक्षर कोठारी, किशोरी आंबीये, दिपाली पानसरे, अपूर्वा सपकाळ, रोहिणी नाईक, ध्रुव दातार आणि ऋत्विक तळवलकर यांच्या भूमिका आहेत.