‘मन झालं बाजींद’, ‘तू तेव्हा तशी’ मालिकांचा महाएपिसोड; एक तासाच्या विशेष भागात काय घडणार?

| Updated on: Apr 07, 2022 | 4:17 PM

झी मराठी वाहिनीवर येत्या रविवारी 'मन झालं बाजींद' (Man Jhala Bajind) आणि 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Ashi) या लोकप्रिय मालिकांचा एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही मालिका आता रंजक वळणावर आल्या आहेत.

मन झालं बाजींद, तू तेव्हा तशी मालिकांचा महाएपिसोड; एक तासाच्या विशेष भागात काय घडणार?
Mann Zala Bajind and Tu Tevha Tashi
Image Credit source: Instagram
Follow us on

झी मराठी वाहिनीवर येत्या रविवारी ‘मन झालं बाजींद’ (Man Jhala Bajind) आणि ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Ashi) या लोकप्रिय मालिकांचा एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही मालिका आता रंजक वळणावर आल्या आहेत. ‘मन झालं बाजींद’मध्ये प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राया कृष्णासाठी विधिलिखिताशी लढतोय. कृष्णाला राया विधात्यांच्या घरी थाटामाटात आणण्याचं सांगतो आणि त्याच्या तयारीला लागतो. तर दुसरीकडे अंतरा, घुली मावशी आणि रितिक कृष्णाला जीवे मारण्याचा कट रचत आहेत. त्या कटानुसार कृष्णा घराबाहेर पडताक्षणी तिचं अपहरण करून तिला एका निर्मनुष्य ठिकाणी ठेवण्यात येतं. रायाला या गोष्टीचा सुगावा लागताच तो तिला वाचवण्यासाठी लगबग करतो. राया विधिलिखिताशी लढून कृष्णाचं प्रेम जिंकू शकेल का, राया कृष्णाला वाचवू शकेल का हे प्रेक्षकांना रविवार 10 एप्रिल रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळेल. (Special Episodes)

मन झालं बाजींद या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात ही कृष्णाच्या भूमिकेत आहे तर अभिनेता वैभव चव्हाण हा रायाची भूमिका साकारतोय. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय. दुसरीकडे स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेनंही अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

पहा मालिकांचा प्रोमो-

एक तासाच्या विशेष भागात प्रेक्षक पाहू शकतील की सौरभ राहत असलेल्या वाड्यात रामनवमीनिमित्त उत्सव असणार आहे. ज्यासाठी अनामिकालादेखील आमंत्रण दिलं गेलंय. मावशी सतत सौरभच्या लग्नाचा विषय काढत असल्यामुळे वल्लीला टेन्शन आलं आहे. म्हणून ती शक्कल लढवते आणि सौरभने लग्न केलं तर वाड्यावरचा हक्क तो सोडून देईल असे कागदपत्र बनवून त्यावर सौरभची सही घेते. दुसरीकडे अनामिकाला सौरभची मंडळी म्हणजे त्याची बायको असा गैरसमज झाला आहे. आजपर्यंत वल्ली आणि अनामिकाची भांडणं प्रेक्षकांनी पाहिली आहेत पण सौरभच्या घरी आल्यावर वल्लीला पाहून अनामिकाची काय प्रतिक्रिया असेल हे प्रेक्षकांना या विशेष भागात दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता पाहायला मिळेल.

हेही वाचा:

Lock Upp: पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मंदाना करीमीचा धक्कादायक खुलासा, “ओळखीतल्या प्रत्येकीशी त्याचे शरीरसंबंध..”

Asawari Joshi: “राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन”; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशींचं विधान