‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्रीला पुण्यातील नवले ब्रिजजवळ गुंडांनी अडवलं; सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, गृहखात्याच्या नाकावर टिच्चून..
सुप्रिया सुळे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्या अशी मागणी करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.

‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी पुण्यात त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत असताना पुण्यातील नवले ब्रिज परिसरात चार जणांनी त्यांच्या गाडीला मुद्दाम धडक देत ती अडवली, तसंच पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कल्याणी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत दिली. या घटनेनंतर पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
कल्याणी नंदकिशोर यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या मुंबईहून साताऱ्याकडे जात होत्या. नवले ब्रिजजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारला धडक देऊन गाडी थांबवली. त्यानंतर या व्यक्तींनी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर त्यांना जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत घेऊन जाण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या झटापटीत त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट-
दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. ‘पुण्यातील नवले ब्रीज परिसरात काही गुंडांनी कल्याणी नंदकिशोर या लोकप्रिय अभिनेत्रीची गाडी अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. पुण्यात गृहखात्याच्या नाकावर टिच्चून गुंड अशा पद्धतीने नागरीकांना त्रास देण्याचे उद्योग करीत आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. माझी राज्याच्या गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया या प्रकरणाची गांभीर्याने नोद घेऊन सदर अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या गुंडांचा योग्य तो बंदोबस्त करावा,’ अशी मागणी त्यांनी केली.
कल्याणी यांचा व्हिडीओ-
विशेष म्हणजे, या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या अनुभवाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याणी नंदकिशोर यांनी नर्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताना महिला पोलीस अधिकारी वर्षा देशमुख आणि ठीटे साहेब यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मात्र, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया बराच वेळ चालल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री 11 वाजता त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या आणि सकाळी 6 वाजेपर्यंत तिथे होत्या.