संवादफेक उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभावही, म्हणत राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांना वाहिली श्रद्धांजली

| Updated on: Nov 26, 2022 | 6:12 PM

काल त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले आहे.

संवादफेक उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभावही, म्हणत राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांना वाहिली श्रद्धांजली
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. पुण्यातील बालगंधर्व येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलंय.

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला जातोय. बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर दु:ख व्यक्त करत, जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ

त्यात अनेकदा असे जाणवत आलेय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच.

त्यांची संवादफेक उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती. तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असते.

पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.